अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात आज एक अतिशय मोठी दुर्घटना घडली. जिल्हा रुग्णालयास भीषण आग लागून त्यात ११ जणांचा मृत्यू झाला. तर, अन्य काहीजण जखमी देखील झाले आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागल्याची घटना घडली. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते आणि हे सर्व रुग्ण करोनाबाधित होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तर, या घटनेची चौकशी करण्यासाठी आता चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेवरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधल्याचं दिसत आहे. “ रूग्णालयातील आगीच्या भंडारासह राज्यात अनेक घटना घडूनही सरकारने कोणताही धडा घेतलेला नाही. नगरच्या घटनेत पोलिसांनी जे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले, त्यात आग सीलिंगमधून सुरू झालेली दिसते, महापालिकेकडून फायर सेफ्टी प्राप्त नाही.वायरिंगबाबत इलेक्ट्रीकल अभियंत्याने कळविलेले, हायड्रेशन आणि स्प्रिंकलर प्रणालीला आर्थिक मंजुरी आरोग्य आयुक्तांकडे काही महिन्यांपासून प्रलंबित. नगर सामान्य रूग्णालयाची ही आहे दुरावस्था. ११ निष्पाप बळी घेणार्या सर्वच दोषींवर कठोर कारवाई व्हावी. शेवटी कुणी जबाबदारी घेणार की नाही? असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. ” “अहमदनगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.” असं देखील फडणवीस यांनी या अगोदर म्हटलेलं आहे. अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… तसेच, “या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.” असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.