राहाता : भाविकांच्या सुरक्षेसोबतच दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने श्री साईबाबा संस्थानमध्ये अत्याधुनिक ‘एआय’ प्रणालीवर (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित भक्तमोजणी प्रणाली योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रणाली खासगी कंपनीच्या देणगीतून उपलब्ध झाली आहे. या प्रणालीचा शुभारंभ आज, गुरुवारी करण्यात आला आहे. या प्रणालीत ‘फेस डिटेक्शन’ तंत्रज्ञानाचाही समावेश करण्यात आला आहे.

एआय आधारित भक्तमोजणी (पीपल काउंटिंग) प्रणालीचा शुभारंभ साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, कंपनीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम अय्यर यांच्या हस्ते झाला. यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व सीसीटीव्ही विभागप्रमुख राहुल गलांडे यांच्यासह कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ रॉय चौधरी तसेच संस्थानचे विविध विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

या नवीन प्रणालीद्वारे मंदिर परिसरातील प्रमुख प्रवेशद्वारांवरून येणाऱ्या भाविकांची अचूक नोंद होणार आहे. दर्शनानंतर मुखदर्शन करून बाहेर जाणारे व बुंदी प्रसाद घेऊन बाहेर जाणाऱ्या भाविकांची मोजणी करण्यात येणार असून, यामुळे दररोज श्री साईबाबांचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची शास्त्रशुद्ध आकडेवारी संस्थानकडे उपलब्ध राहणार आहे. ही माहिती गर्दी नियंत्रण, सुविधा व्यवस्थापन व नियोजनबद्ध सेवा यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या प्रणालीत ‘फेस डिटेक्शन’ तंत्रज्ञानाचाही समावेश असून, संशयित अथवा गुन्हेगारांचे छायाचित्र पूर्वनियोजित पद्धतीने डेटाबेसमध्ये अपलोड केली जातील. अशा व्यक्तींची उपस्थिती आढळल्यास सुरक्षा यंत्रणेला तत्काळ सूचना मिळून त्वरित कारवाई करता येईल. यामुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत लक्षणीय बळकटी येणार आहे.

भाविकसंख्येच्या अचूक नोंदीमुळे भोजन, निवास व अन्य सुविधा अधिक नियोजनबद्धपणे उपलब्ध करून देता येतील. तसेच गर्दीच्या वेळी प्रवेशद्वारनिहाय भाविकांचे विभाजन करून दर्शन प्रक्रियाही अधिक सुकर होणार आहे. सध्या ही प्रणाली नवीन दर्शन रांग येथील कॅमेऱ्यांवर सुरू करण्यात आली असून, आगामी काळात पालखी रस्त्यासह शिर्डी पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील कॅमेरेही या यंत्रणेशी जोडले जाणार आहेत. ही एआय आधारित भक्त मोजणी प्रणाली साईबाबा संस्थानच्या दर्शन व सुरक्षा व्यवस्थापन क्षेत्रात अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास संस्थानतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.