सांगली : जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांचा काँग्रेसमध्ये मानसन्मान राखला जाणार नाही, आपल्या कार्यकर्त्यांचे भले कोणत्या पक्षात आहे हे ओळखून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असे आवाहन आ. सुरेश खाडे यांनी सोमवारी मिरजेत बोलताना केले.मिरज माळी समाजाच्या स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ आज आ. खाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
माजी स्थायी सभापती संजय मेंढे यांनी महापालिकेच्या विशेष निधीतून या कामासाठी ३७ लाख रुपये मंजूर केले आहेत. यावेळी आ. इद्रिस नायकवडी, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, माजी महापौर विजय धुळूबुळू, माजी स्थायी सभापती सुरेश आवटी, माजी नगरसेविका बबिता मेंढे, गणेश माळी, पांडुरंग कोरे आदी उपस्थित होते. प्रारंभी माजी स्थायी सभापती मेंढे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रास्ताविकमध्ये मेंढे यांनी श्रीमती पाटील यांचा सर्वच राजकीय पक्षाकडून शब्द पाळला जात असल्याचे सांगून माळी समाजाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन जागा शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली.
यावर आ. नायकवडी यांनी समाजाच्या ऐक्य भावनेचे कौतुक करत असताना सांगितले, जागा निश्चित करावी, यासाठी निधीची तरतूद शासकीय पातळीवर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वस्त केले. तर आ. खाडे यांनीही शासनाची अथवा महापालिकेची जागा असेल तर त्याचा प्रस्ताव सादर करावा, शक्य झाले तर जिल्हा स्तरावर यासाठी प्रयत्न केले जातील, गरज भासली तर मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.