राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नामुळे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार पत्रकारांवर चांगलेच संतापल्याचं चित्र शनिवारी अमरावतीमध्ये पहायला मिळालं. शरद पवार हे अजित पवारांवर नाराज असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पत्रकाराने अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी चिडूनच या प्रश्नाला उत्तर दिलं.

शरद पवार नाराज आहे असं बोललं जात आहे, असं म्हणत पत्रकाराने चर्चांवर अजित पवारांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पत्रकाराच्या तोंडून हे वाक्य ऐकताच अजित पवारांनी चिडूनच, “हे धादांत खोटं आहे. कोण या कांड्या पेटवतं? तुम्हाला कोणी सांगितलं? पवारसाहेबांनी फोन करुन सांगितलं?” असे प्रतिप्रश्न पत्रकाराला केले. तसेच त्यांनी, “तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे पण मी तर रोज साहेबांच्या संपर्कात असतो. आपल्या ज्ञानामध्ये अशी कोणी भर घातली?” असं म्हणत पत्रकाराला सुनावलं.

प्रसारमाध्यमांना बातम्या मिळत नसल्याने ते अशापद्धतीच्या नाराजीच्या बातम्या पसरवतात असंही अजित पवार म्हणाले. “काय होतं की तुम्हाला ब्रेकिंग न्यूज काही मिळत नाही म्हणून अशाप्रकारच्या बातम्या तुम्ही पसरवता आणि लोकांच्या मनात समज-गैरसमज निर्माण करता,” असं अजित पवार म्हणाले. विरोधी पक्षनेता म्हणून आपलं काम काय आहे हे आपल्याला ठाऊक असल्याचं सांगताना अजित पवार यांनी आपण ३२ वर्ष राजकारण, समाजकारणात असल्याची आठवण पत्रकारांना करुन दिली.

“मी विरोधी पक्षनेता म्हणून माझं काम कसं असावं हे मला कळतं. मी काही दूधखुळा नाही. मी ३२ वर्ष समाजकारण, राजकारण आणि प्रतिनिधित्व करणारा माणूस आहे. त्यामुळे तुम्ही माझी काळजी करु नका. मला ज्या आमदारांनी विरोधी पक्षनेतेपद दिलं त्यांना याच्याबद्दल काय वाटतं ते आम्ही आणि ते बघू,” असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच प्रसारमाध्यमांना सल्ला देताना अशा नाराजीच्या बातम्यांऐवजी महत्त्वाच्या विषयांकडे त्यांनी लक्ष द्यावं असंही अजित पवार म्हणाले. “आपण बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यावं. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, जे महापुरुषांबद्दल अपमानास्पद शब्द वापरतात, बेताल वक्तव्य करतात, आपल्या सीमावादाबद्दल ज्या पद्धतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक भूमिका घेताना इथले मुख्यमंत्री दिसत, ठराव होताना दिसत नाही, विदर्भातील, मागासलेल्या भागातील प्रश्न आहेत यांना महत्त्वं देऊ हे जास्त महत्त्वाचं आहे,” असं अजित पवार म्हणाले.