महाराष्ट्रामधील करोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. असं असतानाच आता पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लागू केले जाणार का? यासंदर्भात दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरु झाली आहे. याचसंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये महत्वाचं भाष्य केलं आहे. राज्यामध्ये पुन्हा मास्कसक्ती करण्याचा पुन्हा निर्णय घेतला जाईल का असं विचारण्यात आलं असता अजित पवार यांनी जर तरच्या भाषेमध्ये या प्रश्नाला उत्तर दिलं. सध्या वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पुन्हा एकदा मास्कसक्ती केली जाईल अशी जोरदार चर्चा असतानाच उपमुख्यमंत्र्यांनी याच संदर्भात सरकारचं धोरणं काय असेल याबद्दल सांगितलंय.

नक्की वाचा >> “ऑपरेशनला गेले आणि…”; मास्क न वापरण्यावरुन अजित पवारांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती दिली. यावर पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे सांगितलं. “मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये आम्हाला डॉक्टर व्यास सर्व माहिती देतात. जगात काय चाललंय, देशात काय चाललंय, राज्यांमध्ये काय चाललंय, राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काय चाललंय हे आम्हाला सांगतात. या सर्व माहितीमधून सध्या एक पहायला मिळालं की करोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या वाढतेय. मात्र व्हेटिंलेटर, ऑक्सिजन बेडवर फार कमी लोक आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

पुढे बोलताना, “डॉक्टरांचा सल्ला घेऊन बुस्टर डोस घेतला पाहिजे. अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तो घेतला पाहिजे. दोन्ही डोस घेणाऱ्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने तिसरा घेतला पाहिजे,” असंही अजित पवार म्हणाले. त्याचप्रमाणे, “आमची त्यावर नजर आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की मास्क वापरणं बंधनकारक केलं पाहिजे तेव्हा आम्ही लगेच मास्क बंधनकारक करु,” असं अजित पवार म्हणाले.

नक्की वाचा >> “अजित पवारांचा फायनान्स विषय कच्चा, बुद्धीमान माणसा…”; निलेश राणेंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

त्यानंतर अजित पवारांनी हिंदीमधून वेगवगेळ्या विषयांवर प्रतिक्रिया दिल्या. पत्रकार परिषद संपण्याच्या आधी एका मराठी महिला पत्रकाराने मास्क बंधनकारक करण्यावरुन पुन्हा अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजित पवारांनी काही राजकारण्यांना मास्क न घातल्याने पुन्हा करोनाची लागण झाल्याचा उल्लेख केला.

मास्क बंधनकारक करण्याचा विचार केला जातोय का? असं विचारलं असता अजित पवार यांनी, “विचार करावाच लागेल. तुम्हाला करोना झाला तर आम्हाला कोण प्रश्न विचारणार,” असं उत्तर दिलं असता सर्व पत्रकार हसू लागले. पुढे बोलताना अजित पवार यांनी, “सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघा काही काही राजकीय नेते मास्क वापरत नव्हते त्यांना दुसऱ्यांदा करोना झाला,” असं म्हटलं. अजित पवार यांच्या वक्तव्याचा रोख राज ठाकरेंच्या दिशेने होता.