लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. विविध मतदारसंघात जाऊन स्टार प्रचारक उत्स्फूर्त प्रचार करत आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी ही लढत रंगणार असल्याने अनेक मतदारसंघात दुहेरी लढत पाहायला मिळतेय. बारामती लोकसभा मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे महिलेविरोधात महिला उभी राहिली आहे. असं असतानाही सुप्रिया सुळेंचं एक वक्तव्य सध्या बरंच चर्चेत आहेत. काल (७ मार्च) नवी मुंबईत झालेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सगळे माझ्याविरोधात एक झाले आहेत. सगळे पुरूष माझ्याविरोधात एक झाले आहेत. मी ईस्ट इंडिया कंपनी झाली आहे. सगळे माझ्याविरोधात एक झाले आहेत. मी एकटी त्यांच्याविरोधात एकटीने लढते आहे. कारण मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. मोडेन पण वाकणार नाही.”

हेही वाचा >> “सुप्रिया सुळे सारखं दादा-दादा करायच्या, तेव्हा मला राग यायचा”, जितेंद्र आव्हाडांची उघड नाराजी; म्हणाले…

विरोधकांचा कार्यक्रम हाणून पाडायचा

“कितीही पुरूष एकत्र येऊ देत, विरोध करू देत, मला काही फरक पडत नाही. फक्त बारामती मतदारसंघात शरद पवारांना संपवायचं आहे, हा एकच कार्यक्रम विरोधकांनी हाती घेतलेला आहे. हा कार्यक्रम पूर्ण ताकदीने, स्वाभिमानाने आणि सत्याच्या बाजूने आपल्याला हाणून पाडायचा आहे”, असं आवाहनही त्यांनी जनतेला केले.

शिवसेनेचे जे झालं तेच आमचं झालं

सुप्रिया सुळे म्हणाल्या, जे शिवसेनेचे झाले तेच आमचे झाले. पक्ष पळवला, चिन्ह चोरले. ऐन निवडणुकीत काँग्रेसचे बँक खाते सील केले. हे सुडाचे राजकारण आहे. यापूर्वी अनेक मतभेद होते मात्र सुडाचे राजकारण नव्हते असे सांगत शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधाचे उदाहरण सुप्रिया सुळे यांनी दिले. 

त्या पुढे म्हणाल्या, अशोक चव्हाण यांचा माझ्याविषयी गैरसमज झाला मात्र निर्मला सीतारामण यांनी सर्व आदर्श ऐकले पण आदर्श घोटाळा ऐकला नाही असे म्हटल्यावर मी त्याला सर्वाधिक विरोध केला. असाच आरोप केजरीवाल यांच्यावर केला गेला पण केजरीवाल यांनी भाजप प्रवेश केला नाही म्हणून ते तुरुंगात आणि भाजपमध्ये गेले म्हणून अशोक चव्हाण बाहेर कसे.