राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात हे दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तर, शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंचा एका कारणावरून प्रचंड राग यायचा, असं जाहीरपणे सांगितलं आहे.

नवी मुंबईत महासभा एकनिष्ठतेची या मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “बहिणीची नक्कल करणारा पहिला भाऊ महाराष्ट्राने पहिला आहे. सुप्रिया सुळे अजित पवारांना सारखं माझा दादा, माझा दादा करायच्या. मला प्रचंड राग यायचा. आता राग शांत झाला आहे. पण हे प्रेम बहिणीचं होतं, हे प्रेम आपलेपणाचं होतं. हे प्रेम घर तुटू नये म्हणून होतं. पण दादा तुम्हाला समजलंच नाही. प्रेम समजायला हृदय लागतं.”

हेही वाचा >> “रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनीही त्याच मेळाव्यातून उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “जितेंद्र आव्हाड माझ्यावर तुटून पडले. पण, मी त्यांना एक गोष्ट सांगितली की रिश्ते तोडना बहोत आसान है, पर रिश्ते निभाने के लिए ताकद लगती है (नातं तोडणं सोपं असतं पण निभावणं कठीण असतं ). मी नातं जोडणाऱ्यातली आहे, तोडणाऱ्यातली नाही.”

सुप्रिया सुळे आणखी काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे म्हणाल्या, जे शिवसेनेचे झाले तेच आमचे झाले. पक्ष पळवला, चिन्ह चोरले. ऐन निवडणुकीत काँग्रेसचे बँक खाते सील केले. हे सुडाचे राजकारण आहे. यापूर्वी अनेक मतभेद होते मात्र सुडाचे राजकारण नव्हते असे सांगत शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधाचे उदाहरण सुप्रिया सुळे यांनी दिले. 

त्या पुढे म्हणाल्या, अशोक चव्हाण यांचा माझ्याविषयी गैरसमज झाला मात्र निर्मला सीतारामण यांनी सर्व आदर्श ऐकले पण आदर्श घोटाळा ऐकला नाही असे म्हटल्यावर मी त्याला सर्वाधिक विरोध केला. असाच आरोप केजरीवाल यांच्यावर केला गेला पण केजरीवाल यांनी भाजप प्रवेश केला नाही म्हणून ते तुरुंगात आणि भाजपमध्ये गेले म्हणून अशोक चव्हाण बाहेर कसे.