सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण होणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी धरण ८७ टक्के भरले असून मंगळवारी सकाळी ८ वाजता या ठिकाणची पाणीपातळी ५१८.८० मीटर होती. धरण क्षेत्रात संततधार सुरू असल्याने चांदोली धरणातील पाणीसाठा ८४  टक्के झाला असून बुधवारपासून वारणा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. अलमट्टीतून विसर्ग न वाढविल्यास येत्या काही दिवसांत सांगली-कोल्हापूरला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.
सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या कृष्णा, पंचगंगा नदीतून कर्नाटकात जाणारे पाणी आज सकाळी राजापूर बंधाऱ्यानजिक ५७  हजार १४१ क्युसेक प्रतिसेकंद असून अलमट्टी धरणाचा विसर्ग ४२ हजार क्युसेक असल्याचे सांगलीतील जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. १२५ टीएमसी क्षमता असलेल्या अलमट्टी धरणात आज सकाळपर्यंत १०९.१४ टीएमसी पाणीसाठा झाला असून क्षमतेच्या ८७.३१ टक्के झाला आहे.
अलमट्टी धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद १ लाख ५ हजार क्युसेक असून विसर्ग अवघा ४२ हजार आहे. धरणातील पाणीपातळीची कमाल मर्यादा ५१९.६० मीटर असून क्षणाक्षणाला पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा असा जोर राहिला तर हे धरण भरण्यास दोन-तीन दिवसांचा अवधी पुरेसा ठरणार आहे.
अलमट्टी भरत आले असताना कोयना जलाशयात ५६.१८ टीएमसी म्हणजे ५३ टक्के व वारणामध्ये २८.८५ टीएमसी ८४ टक्के जलसाठा झाला आहे. सध्या विद्युत निर्मितीसाठी केवळ वारणा धरणातून १७५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून उद्यापासून नदीपात्रातील विसर्ग वाढविण्यात येण्याची शक्यता आज जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
सांगली जिल्ह्यात श्रावणसरींनी दमदार हजेरी लावली असून आटपाडी व कडेगाव तालुके वगळता सर्व तालुक्यात जोर धरला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद शिराळा येथे ३९ मिलिमीटर झाली असून अन्य तालुक्याच्या ठिकाणी आज सकाळी ८ वाजता नोंदविण्यात आलेला पाऊस असा-  सांगली  ०.४०, मिरज ८.२०, पलूस ३, विटा २, कवठेमहांकाळ ५.४०, जत २.