राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध स्तरावरून राज्यपालांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मराठी माणसांविषयी, मराठी भाषेवर खूप प्रेम आहे. मात्र, अनेकदा त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात येतो, असे त्या म्हणाल्या. हेही वाचा - महाराष्ट्र-कर्नाटक वादावर उदयनराजेंनी केलं भाष्य; म्हणाले, “हा सगळा महाजन समितीचा घोळ, केंद्राने आता… ” काय म्हणाल्या अमृता फडणवीस? पतंजली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्यावतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन ठाण्यातील हायलँड भागात करण्यात आले होते. या संमेलनास अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता, ''महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे एकमेव राज्यपाल आहेत. जे महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकलेत. मराठी माणसांवर त्यांचे खूप प्रेम आहे. हे मी स्वत: अनुभवलं आहे. मात्र, अनेक वेळा त्यांच्या भाषणाचा चुकी अर्थ काढण्यात येतो. यापूर्वीही असं अनेकदा घडलं आहे. मात्र, त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे, निश्चित आहे'', अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. हेही वाचा - Shraddha Murder: ‘त्या’ तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांचीच होणार चौकशी? शाह म्हणाले, “तेव्हा तेथे आमचं सरकार नव्हतं, मात्र…” https://twitter.com/LoksattaLive/status/1596080508194410496?s=20&t=PcybWjaaVjS41V1Qlxj55A दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी श्रद्धा हत्याकांड प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. ''हा अत्यंत धक्कादायक प्रकार असून अशा घटनेच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. आरोपीला कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. तसेच तपासांत काही त्रृटी राहिल्या असतील, तर तपास करणाऱ्यांवरही कारवाई होणं गरजेचं आहे'', असे त्या म्हणाल्या.