राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी ३ मे रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जो त्यांनी काल (५ मे) मागे घेतला. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर शरद पवारांना राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा लागला. काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. यावेळी शरद पवार म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या तीव्र भावना उमटल्या. तसेच मी या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी कार्यकर्ते करत होते. माझे सर्वच हितचिंतक, माझ्यावर प्रेम करणारे आणि माझ्यावर विश्वास असणारे कार्यकर्ते, नेते आणि चाहते या सर्वांनी एकत्र येत आवाहन केलं. त्यामुळे मी राजीनामा मागे घेत आहे.” शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया याबाबत म्हणाल्या की, शरद पवारांनी राजीनामा दिला काय आणि तो मागे घेतला काय हे सगळं पाहून असं वाटलं की, हे सगळं एक नाट्य होतं. या नाट्याचा अनेकांना धक्का बसला, तर काहींना हा प्रकार आवडला नाही. या नाट्यानंतर काही लोकांनी मला या नाट्यावरील वेगवेगळे विनोद पाठवले. हे ही वाचा >> “अजित पवार शांत बसणार नाहीत, येत्या काही दिवसात…”, अंजली दमानियांचा मोठा दावा अंजली दमानिया म्हणाल्या, हे नाट्य पाहून असं वाटलं की, माझीच बॅट, माझाच बॉल, मीच अम्पायर आणि मीच सगळं काही. मला जे काही करायचं आहे ते मीच करणार आहे. मी माझा राजीनामा माझ्याकडे दिला. मला माझा राजीनामा मान्य नव्हता म्हणून मीच तो स्वीकारला नाही. त्यामुळे मी आता परत या पदावर येऊन लढणार आहे, अशी शरद पवारांची स्थिती आहे.