धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केला. नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष, हातात पोस्टर, झेंडे घेतलेला प्रचंड मोठा जनसमुदाय आणि महायुतीच्या घटक पक्षातील सर्वच प्रमुख नेते आणि पदाधिकार्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला होता. महायुतीच्या एकोप्याची वज्रमूठ प्रचंड शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून धाराशिवकरांनी अनुभवली. लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, पालकमंत्री तानाजी सावंत, राज्यमंत्री संजय बनसोडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू आमदार राजाभाऊ राऊत, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते. आणखी वाचा-माढ्यात महाविकास आघाडीविरुद्ध प्रा. लक्ष्मण हाके यांची बंडखोरी, महात्मा फुलेंच्या वेशभूषेत भरली उमेदवारी दरम्यान शहरातील जिजाऊ चौक येथून महायुतीतील राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना शिंदे गट, रिपाइं आठवले गट, मनसे आदी पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांच्या रॅलीस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर उमेदवार अर्चना पाटील या ग्रामदैवत हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी यांच्या दर्गाह, धारासूर मर्दिनी मंदिर व त्यानंतर काळा मारूती मंदिरात दर्शन घेवून रॅलीत सहभागी झाल्या. ही रॅली आर्य समाज चौक, संत गाडगेबाबा चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आल्यानंतर उमेदवार अर्चना पाटील यांनी महामानव डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाण, माजी नगराध्यक्ष संपत डोके, बिभीषण काळे यांनी भाजपात प्रवेश केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार सतीश चव्हाण, आमदार अभिमन्यू पवार यांची भाषणे झाली.