नगर : राज्य सरकारच्या ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेत (२०२१-२२)’ नगर जिल्ह्याने तीन पुरस्कार पटकावले आहेत. अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय (१० लाख रु.), जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (शासकीय अधिकारी गट, ५० हजार रु.) व राहाता पंचायत समिती (४ लाख रु.) यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल यांनी आज, सोमवारी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. प्रशासन सेवांच्या गुणवत्तेत वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता तसेच सर्वाच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्यासाठी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ हे अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना किंवा उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिके देण्यात येतात. या अभियानात ‘प्रशासकीय गतिमानता’अंतर्गत विभागीय स्तरावरील प्रथम पुरस्कार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झाला आहे. रोख १० लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्यापासून ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत दैंनदिन टपालाचे वितरण करण्यासाठी विकसित केलेल्या ‘ई-टपाल प्रणाली’ या उपक्रमास हा पुरस्कार देण्यात आला. या अभियानात शासकीय अधिकारी गटातील राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना मिळाला आहे. रोख ५० हजार रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शेतकरी व नागरिकांचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याकरिता जिल्ह्यात ‘महसूल विजय सप्तपदी अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमांसाठी जिल्हाधिकारी भोसले यांना हा पुरस्कार मिळाला आहे. राहाता पंचायत समितीचे यश विभागीय स्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार राहाता पंचायत समितीला मिळाला आहे. रोख ४ लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी नागरिकांच्या स्थानिक समस्यांचे थेट निराकरण करणे, करोना कालावधीत मदत, बचतगटांच्या उत्पादनाची विक्री व प्रदर्शन, घरकुल प्रकल्प सक्षमपणे राबविण्यासाठी हा पुरस्कार राहाता पंचायत समितीला देण्यात आला आहे.