लोकसत्ता प्रतिनिधी सोलापूर : बैलांच्या खुराने शेती केली की घरात खोऱ्याने समृध्दी येते, असं मानणारा शेतकरी आणि वाळलेला कडबा गोड मानून धन्याच्या सोबत स्वतःही शेतात राबणारा बैल यांच्यातील नात्याने बंध अधोरेखित करणारा बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सण. परंतु यंदा दुष्काळाचे सावट पसरल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात बैलपोळा सणात कोठेही उत्साह दिसून आला नाही. अशा निरूत्साही आणि काळजीवाहू वातावरणात बैलपोळा सण साजरा झाला. यंदा पावसाळ्यात संपूर्ण निराशा केली असून खरीप पिकांचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. यातच उजनी धरणात अत्यल्प पाणीसाठा असून इतर लहानमोठी धरणे, नदी-नाले, ओढे कोरडे असल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. विशेषतः सांगोला, माळशिरस करमाळा, पंढरपूर, माढा आदी भागात पावसाने निराशा केली आहे. धरणातील जेमतेम शिल्लक पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखीव आहे. खरीप पिकांचे उत्पादन कमालीचे घटण्याची परिस्थिती दिसत असताना मुक्या जनावरांना जगविण्यासाठी चाऱ्याचीही टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यात केवळ दीड महिना पुरेल इतका चारा शिल्लक असल्याचे बोलले जाते. यातच गाय- बैलांना लम्पी आजाराच्या साथीने पुन्हा पछाडले आहे. जनावरांचे संगोपन करण्याचा खर्च आवाक्याबाहेर जात असताना दुसरीकडे शेतातील कामांसाठी यांत्रिकीकरणावर भर दिला जात आहे. आणखी वाचा-सांगली : दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी महामार्गावर ठिय्या या पार्श्वभूमीवर शेतात आपल्यासोबत राबणाऱ्या बैलांबरोबर असलेले नाते टिकविण्यासाठी दुःख बाजूला ठेवून शेतक-यांनी बैलपोळा साजरा केला. एरव्ही, ओढ्यावर बैलांना घासून पुसून आंघोळ घालणारे शेतकरी आज मात्र ओढा कोरडाठाक असल्यामुळे शेतात किंवा वस्तीवर आंघोळ घालून, रंगरंगोटीसह त्यांच्या शिंगांना हिंगूळ, बेगड, आकर्षक गोंडे लावत होते. काही गावात शेतकऱ्यांनी नटवून- सजवून बैलांची वाजतगाजत मिरवणुका काढल्या. मात्र दुष्काळामुळे खरीप हंगाम वाया जात असल्यामुळे बहुतांश ठिकाणी बैलपोळा साधेपणाने साजरा झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज गावात सतीश अर्जुन गवळी या शेतकऱ्याने आपल्या सर्जा-राजा बैलजोडीच्या पोटावर 'दुष्काळ जाहीर करावा', अशा मागणीचा मजकूर लिहून ग्रामीण भागातील व्यथा मांडली होती.