लोकसत्ता प्रतिनिधी सांगली : दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी गुरूवारी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे गावबंद पाळून महामार्ग रोखण्यात आला. या आंदोलनामुळे गुहागर-विजापूर मार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. दुष्काळ जाहीर करा, चारा छावण्या सुरू करा, कर्जमाफी करा, बोगस लावलेली पीकपाणी नोंदी रद्द करा आदी मागण्यासाठी मणेराजूरी (ता. तासगांव ) बसस्थानक चौकात गुहागर-विजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस व ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकर्यांनी गुरुवारी गांव कडकडीत बंद ठेवून सकाळी नऊ वाजलेपासून रास्ता रोको सुरु केला. यावेळी बैलगाडी बैलासह रस्त्यावर आणून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. महामार्गावरच ग्रामस्थांनी ठिय्या मारल्याने वाहतूक सुमारे अडीच तास ठप्प झाली होती. आणखी वाचा-अनाथ मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षे सक्तमजुरी तालुका कृषी अधिकार्यांनी चुकीचा अहवाल पाठवून गावात ५५ टक्के खरीपाच्या पेरण्या झाल्याचा अहवाल दिला असून प्रत्यक्षात २० ते २५ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. यामुळे पैसेवारी पन्नासहून कमी असताना चुकीचा अहवाल दिला असल्याचा आरोप करण्यात आला. दुष्काळी स्थितीमुळे पाण्याची अवस्था बिकट आहे. शासनाने सिंचन योजना सुरू ठेवून गावतळी व शेततळी भरून द्यावीत आदी मागण्या करण्यात आल्या. आमदार सुमनताई पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश पवार, खंडू पवार, दामू पवार, अरुण पवार, हणमंत देसाई आदींनी मागण्याचे निवेदन तहसिलदार रविंद्र रांजणे यांना दिले.