कोल्हापूर विमानतळ सेवेने सोमवारी (१० जानेवारी) आणखी एक झेप घेतली. माल वाहतूक सेवेला (कार्गो) भारतीय नागरी विमान सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस) मान्यता दिली आहे. यामुळे जिल्ह्याच्या शेती, शेतीपूरक व्यवसाय, स्थानिक उद्योग आणि व्यवसाय वाढीला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज व्यक्त केला.

कृषी उत्पादन, औद्योगिक, दुग्धोपादन आणि वैद्यकीय क्षेत्रातून कोल्हापूर विमानतळावरून माल वाहतूक सेवा सुरू व्हावी यासाठी भारतीय नागरी विमान सुरक्षा ब्युरोकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. ते म्हणाले, “आता या सेवेला मंजुरी मिळाल्यामुळे उद्योजक आणि शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. त्याचबरोबर स्थानिक उद्योग, शेती व शेतीपूरक उत्पादनाला उत्तेजन मिळेल.”

हेही वाचा : कोल्हापूरचा फरार कुख्यात भूखंड माफिया संजय तेलनाडेला पुण्यात अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम महाराष्ट्राला लाभ

“कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील शेतमाल, उद्योगांच्या हवाई वाहतुकीसाठी सेवेचा मोठा फायदा होईल. स्थानिक उत्पादन अन्य राज्यांबरोबरच आंतरराष्ट्रीय विमानतळाहून परदेशी बाजारपेठेत जाऊन जिल्ह्याचा विकास साधला जाईल. सुरक्षित, फायदेशीर आणि शाश्वत पुरवठा साखळीद्वारे स्थानिक उद्योगांचे मुल्य वाढेल. ही सेवा जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक स्वरुपावर सकारात्मक दीर्घकालीन परिणाम करण्यात महत्वाची भूमिका बजावेल,” असंही सतेज पाटील यांनी नमूद केलं.