Beed Crime बीडमध्ये एका तरुणीने छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना १४ मार्चला घडली. त्यानंतर एक महिन्यानंतर मुलीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं आहे. तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूला एक महिना उलटून गेला तरीही आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असंही या मुलीच्या आईने म्हटलं आहे.

मुलीच्या आईने पत्रात काय म्हटलं आहे?

प्रति, एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

सन्मानीय महोदय,
साहेब मी तुमची लाडकी बहीण. तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि राज्यातल्या अस्वस्थ झालेल्या बहिणींना आधार मिळाला. आपण मुख्यमंत्री असताना आपल्या म्हणजेच आम्हांसारख्या अगणित बहिणींना भावाचा बंध मिळाला. मी नाराज आहे, आज आपण उपमुख्यमंत्री आहात. मात्र माझ्यासाठी तुम्हीच लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री आहात. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालत आनंद दिघे यांची प्रेरणा घेऊन आपण राज्याचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवशाही प्रमाणे हाताळत आम्हाला न्याय दिला. आम्ही त्याबद्दल ज्ञात आहोत. परंतु आज आम्हाला तुमची कमतरता भासते. माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचे होते. मात्र ती एका क्षणात नाहीशी झाली. काही मुलांनी तिची छेड काढली आणि साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. साहेब, आम्ही आस धरुन आहोत. तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही, हे आम्हाला देखील माहीत आहे. मात्र त्या क्रूर नराधमांना देखील तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी बीडमध्ये आले. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सर्वांना माहीत आहे, आपण असला असता तर पीडित बहिणीला भेटल्याशिवाय गेला नसता. याची प्रचिती महाराष्ट्राला आणि लाडक्या बहिणींना आहे.

मुलीच्या आईने पत्रात पुढे काय म्हटलं आहे?

साहेब, बीडमध्ये केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK महाविद्यालय आहे. याच महाविद्यालयात कला शाखेच्या तृतीय वर्षात साक्षी शिक्षण घेत होती. काही मुलांनी तिची छेड काढली. तिला ब्लॅकमेल करुन तिच्यासोबत अनैतिक कृत्य केलं. जबरदस्ती व्हिडीओ आणि फोटो काढण्यात आले. या अत्याचाराला कंटाळून साक्षीने मामाच्या घरी धाराशिव येथे जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. आम्ही बीडचे रहिवासी आहोत, आरोपीही बीडचाच राहणारा आहे. माझ्या मुलीने धाराशिव येथे असताना गळपास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे तो गुन्हा धाराशिव सिटी पोलीस ठाण्यात नोंद आहे. शिंदे साहेब, तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता. यावर आम्हाला ठाम विश्वास आहे. यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केले आहे. धाराशिव येथील पोलीस उपअधीक्षक राठोड यांनी आमचा कसलाही जबाब घेतला नाही. उलट आम्हाला अपमानित केलं. आम्हाला तासंतास कार्यालयाबाहेर बसवण्यात आलं. ही बाब सीसीटीव्हीटीत कैद आहे. आरोपीची बहीणही यात आरोपी आहे. मात्र ती पोलीस दलात कार्यरत आहे त्यामुळे धाराशिव पोलीस आम्हाला कसलीही मदत करत नाहीत.

पोलिसांनी सहकार्य केलं नसल्याचाही आरोप

ज्या आरोपी मुलाने छेडछाड केली, माझ्या मुलीला ब्लॅकमेल केलं त्याच्या मोबाइलमधील चॅटिंग पोलिसांनी अद्याप उघड केलेलं नाही. तसंच केएसके महाविद्यालयातील इतर दोन मुलींनीही अशाच छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. आरोपी मुलाचे बीड शहरातील गुंडांशी संबंध असल्याने कोणतेही पालक पुढे येऊन फिर्याद देत नाहीत. या गुंडांची दहशत पाहता आम्ही कोणाला न्याय मागायचा हा प्रश्न पडला आहे. साहेब आपण मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री असता तर या गुंडांचा खात्मा करुन आम्हाला न्याय दिला असता, आताही केवळ तुमच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आपण आम्हाला न्याय देऊन गुंडांना शिक्षा द्याल एवढीच अपेक्षा आहे.

आपलीच लाडकी बहीण

कोयना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असं पत्र साक्षीच्या आईने लिहिलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. साक्षी ही बीड जिल्ह्यातील केएसके महाविद्यालयात शिक्षणत होती. तिने १४ मार्चला धाराशिव येथे मामाच्या घरी गळफास घेत आपले जिवन संपवले होते. याला आता एक महिना झाला आहे. असं असताना साक्षीला ज्यांच्या मुळे हे पाऊल उचलावे लागले ते आरोपी मात्र अजून ही मोकाट आहेत. पीडित कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.