अयोध्येतील राम मंदिरावरुन शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ले करत असताना बुधवारी मुंबईत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हाणामारीपर्यंत पोहोचले. यानंतर पुन्हा एकदा दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असून राजकीय तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेकडून सामनामधून भाजपाला उत्तर दिलं जात असताना भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा असा टोला लगावला आहे. अतुल भातखळकर यांनी एकामागोमाग अनेक ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “राम मंदिर उभारणीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, आम आदमी पार्टी, डावे हे पक्ष बदनाम करत आहेत. हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक पक्ष आहेत”, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. "जनता इटालियन लोटांगण घालू, सुपारीबाज रामद्रोह्यांचे 'राम नाम सत्य हैं' केल्याशिवाय राहणार नाही," असंही यावेळी ते म्हणाले आहेत. जनता इटालियन लोटांगण घालू, सुपारीबाज रामद्रोह्यांचे 'राम नाम सत्य हैं' केल्याशिवाय राहणार नाही. — Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021 पुढील ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील नव बाबरवाद्यांचा रामभक्तांपुढे कधीही टिकाव लागणार नाही असं म्हणत शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा असा सल्लाच दिला आहे. शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा. — Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021 अस्तनीतल्या निखाऱ्यांपासून सावध राहा! दरम्यान, यासोबतच अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. “वसूली सेनेने इटालियन काँग्रेसकडून राम मंदिर आंदोलन बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे. बाबरप्रेमी पप्पू आणि पप्पूच्या मम्मीला खूष करण्यासाठी मंदिर उभारणीला बदनाम करण्याचे आणखीन प्रयत्न होतील. अस्तनीतल्या निखाऱ्यांपासून जनतेने सावध राहावे”, असं ट्वीट भातखळकरांनी केलं आहे. भातखळकर यांच्याप्रमाणेच इतर भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नेमकं झालं काय? अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेनं आक्रमक शब्दांत टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनाच्या बाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. याची माहिती मिळताच मोठ्या संख्येनं शिवसेना कार्यकर्ते जमा झाले. यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आधी वाद आणि त्याचं पर्यवसान बाचाबाचीमध्ये झालं. “भाजपा कार्यकर्ते शिवसेना भवनवर हल्ला करणार होते” दरम्यान, भाजपा कार्यकर्ते विटा, दगडं घेऊन शिवसेना भवनावर हल्ला करण्यासाठी आले होते, असा खळबळजनक दावा शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. “भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवेसना भवनात जमले होते. पण जेव्हा भाजपाचे काही कार्यकर्ते विटा, दगडं घेऊन शिवसेना भवनवर हल्ला करण्यासाठी येत आहेत अशी माहिती मिळाली तेव्हा शिवसैनिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी त्यांना थाबवलं असता बाचाबाची झाली”, असं ते म्हणाले.