शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.

“शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत असं वाटत नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने एक हजार कोटींचं पॅकेज घोषित केलं होतं. पण सरकार गेल्यानं त्यांना कारवाई करता आली नाही. मात्र या सरकारने एक रुपयाही दिला नाही. त्यामध्ये पाच वसतीगृह आहेत. एमपीएससी, युपीएससी विद्यार्थी तसंच घरांसंबंधी निर्णय़ आहेत. विधान परिषदेचं अधिवेशन सुरु झाल्यावर यावर चर्चा करु,” असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे.

“सरकार वेगवेगळ्या समाजासंबधी वेगवेगळी भूमिका घेत आहे. धनगर समाजाचं प्रकरण न्यायालयात असतानाही वकील दिला नाही. राज्यात दोन क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाची ही परिस्थिती असेल तर इतर छोट्या घटकांची काय परिस्थिती असेल हे सांगायची गरज नाही. लोकांना आता शरद पवारांची भूमिका कळू लागली आहे. करोना संकट संपल्यानंतर शरद पवारांविरोधात आंदोलन करु,” असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.