रत्नागिरी: कोकणातील स्वास्थ्य,  वातावरण बिघडविण्याचे काम राज्याच्या सत्ताधारी पक्षातील लोक करीत आहेत. भाजपाचे स्थानिक लोकनेते बेताल वक्तव्य करुन कोकणातील शांत वातावरण बिघडवत आहेत. शक्तीपीठच्या नावा खाली भाजपाच्या लोकांना कोकण विकायचा आहे, अशी टीका कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केली. ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौ-यावर असताना पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, कॉंग्रेस पक्ष कमकुवत असलेल्या कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याकडे जास्त लक्ष देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील बहुतांशी माणूस मुंबई पुण्यात आहे. मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत १५०  पेक्षा जास्त नगरसेवक हे कोकणातील लोक निवडून येत असता. मात्र सद्या राज्यात नंगा नाच सुरु आहे. भाजप आणि मित्र पक्षांकडून महाराष्ट्र लुटण्याचे काम सुरु आहे. सत्ताधारी लोकांच्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. भाजपा शासन फक्त लुटण्याचे काम करत आहे. औरंगजेब हा क्रूर शासक होता. त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस देखील क्रूर शासक आहेत. ते सनातनी धर्माचा आधार घेत आहेत. आज राज्यात महिला सुरक्षित नाहीत. महिलांवर बलात्कार होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतोष देशमुख सारख्या लोकांची क्रूर हत्या होत आहे. राज्य अस्थिर करण्याचे काम भाजपचे सरकार करीत असल्याचा आरोप सकपाळ यांनी यावेळी केला. शक्तिपिठाच्या नावाखाली कोकणातील निसर्ग संपदा बड्या उद्योगपतींना विकायची असल्याचा घाट भाजपाच्या लोकांनी घातला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील डांबर घोटाळा आणि मालवण पुतळा पडण्याचा प्रकार यावर कॉंग्रेस आवाज उठवणार असल्याचे सांगत  कॉंग्रेस पक्षाच्या पडझडीवर आणि पक्षातून जे बाहेर गेले त्यावर बोलणे सकपाळ यांनी टाळले. ते म्हणाले, राज्यात महिलांचे, बेरोजगारीचे तसेच शेतकरी लोकांचे प्रश्न गंभीर आहेत. त्यावर भाजपाचे सरकार काम करीत नाही. मात्र आका, खोक्या आणि बोक्या यावरच त्यांचे लक्ष असल्याचे सकपाळ यांनी सांगितले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी आमदार हुसेन दलवाई, रमेश किर, आमदार भाई जगताप आणि माजी आमदार हुस्नबानू खलीपे उपस्थित होत्या .