मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आज संबोधित केलं. करोनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबरोबच आगामी काळात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचीही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या या सोशल संवादानंतर भाजपा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादातून सामान्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं संवादातून मिळालीच नाहीत,” अशी टीका भाजपानं केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संवादातनंतर भाजपाचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी टीका केली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादातून सामान्य जनतेच्या पदरात काहीच पडलेलं नाही. करोनाला अटकाव कसा घालणार, मिशन बिगीन अगेनची नेमकी कशी अंमलबजावणी करणार, राज्याचे उद्योग चक्र गतीमान कसे करणार, याची उत्तरे मुख्यमंत्र्यांच्या संवादातून मिळाली नाहीत. राज्यात करोनाचं संकट अतिशय भीषण स्वरूप धारण करत चाललं आहे. पुण्यासारख्या शहरात ऑक्सिजनच्या अभावी अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. उपचारासाठी सुरु केलेल्या जम्बो उपचार केंद्रातील सावळा गोंधळ रुग्णांच्या जीवावर उठला आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री राज्यातील करोना अटकावासंदर्भात काही निश्चित धोरण जाहीर करतील अशी अपेक्षा होती . मात्र त्यांनी कोरोनापासून कशी काळजी घ्यावी याची प्राथमिक माहिती देण्यात धन्यता मानली,” अशी टीका उपाध्ये यांनी केली.

“करोनापासून बचाव करण्यासाठी सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा विविध पद्धतीनं काळजी घेतो आहे. त्यापेक्षा सरकारी पातळीवर आरोग्य यंत्रणेद्वारे प्रभावी उपायोजना कशी करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगणे अपेक्षित होते. तसे न करता मुख्यमंत्री उपदेशाचे निरर्थक डोस पाजत बसल्यानं सामान्य माणसाची निराशा झाली. मुख्यमंत्र्यांच्या संवादातून राज्याचे अर्थचक्र गतिमान होण्यासाठी ठोस घोषणा होतील अशीही अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याबाबतही स्पष्ट दिशादर्शन केले नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना काय काळजी घ्या, घरात जेवताना खाद्यपदार्थ मोठ्या बाऊलमध्ये घ्या, बंद जागेत भेटू नका यासारख्या प्राथमिक सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. एवढ्या सूचना द्यायच्या होत्या तर त्यासाठी वृत्तपत्रातून जाहिराती दिल्या असत्या तरी चाललं असतं, तेवढ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचे कष्ट का घेतले, आपला मौल्यवान वेळ नाहक खर्च का केला, असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे,” असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp keshav upadhye uddhav thackeray maharashtra cm coronavirus in maharashtra bmh
First published on: 13-09-2020 at 18:56 IST