शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या गृहसचिवांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजपाचं शिष्टमंडळदेखील पोहोचलं आहे. यामध्ये भाजपा आमदार मिहीर कोटेचा, अमित साटम, पराग शाह, राहुल नार्वेकर आणि विनोद मिश्रा यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेत किरीट सोमय्या तक्रार करणार आहेत.
किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पोहोचल्यानंतर एबीपी माझासोबत संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “महाराष्ट्रात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे म्हणजे माफिया सेनेचे सरदार दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी चालली आहे त्याची माहिती आम्ही देणार आहोत. शिवसेनेचे गुंड लोकांच्या घरात घुसतात, नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण करतात, आमदार-खासदारांना जेलमध्ये टाकतात. खार पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांच्या मदतीने झेड सेक्युरिटी असणाऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. तुझा मनसुख हिरेन करु अशा धमक्या दिल्या जात आहेत…याचा रिपोर्ट आम्ही गृहसचिवांना देणार”.
“उद्धव ठाकरे जगाला मूर्ख समजत आहे. या सरकारमध्ये अक्कल आहे का? पोलीस मला शिवसैनिकांना दोन किमी लांब पाठवलं अशून सुरक्षित असल्याचं सांगतात आणि ड्रायव्हरच्या दारात ७० गुंड दगड, चप्पल, काचेच्या बाटल्या घेऊन उभे होते. गाडीवर हल्ला करतात, काचा फुटतात आणि त्या उद्धव ठाकरेंचं सरकार ड्रायव्हरने बेदरकारपणे गाडी चालवली म्हणतं. यांचे गुंड कमांडोंना मारहाण केली जाते. ड्रायव्हरवर गुन्हा नोंद करतात म्हणजे तर हद्द झाली आहे,” अशी टीका यावेळी किरीट सोमय्यांनी केली.
“खारच्या घटनेतच यांचे १०० अपराध झाले आहेत. म्हणून या उद्धव ठाकरेंना मी आव्हान देतो आहे. मनसुख हिरेन उद्धव ठाकरेंनी घडवला. प्रदीप शर्मांची, सचिन वाझेंची नियुक्ती कोणी केली? उद्धव ठाकरेंनी….आणि आता उद्धव ठाकरे आम्हाला तुमचा मनसुख हिरेन करु अशी धमकी पाठवतात. अरे सात जन्म मनसुख हिरेन केला तरी या माफिया सरकारचा अंत आणणार,” असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले की, “माझ्यावरील हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे घरी बोलावून त्यांचा सन्मान करतं. म्हणतात आणखी गुंडगिरी करा, दहशत माजवा. कारण हे माफिया सरकार आहे. म्हणून आम्ही गृहमंत्रालयाला या सगळ्यांचा तपास करावा यासाठी विनंती करणार आहोत. अजूनपर्यंत कमांडोचा जबाब नाही, एफआयआर नाही. आम्ही सोडणार नाही”.