मागील काही काळापासून माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. पण पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात यावर स्पष्ट विधान केलं होतं. आपण पक्षात नाराज नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर आता त्यांनी बीडच्या पालकमंत्री पदाबाबत स्पष्ट विधान केलं आहे.

तुम्हाला पुन्हा बीडच्या पालकमंत्री व्हायला आवडेल का? असं विचारलं असताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला पालकमंत्री व्हायला आवडेल का? किंवा आवडणार नाही… हा मुद्दाच नाही. मी आता एका वेगळ्या मिशनवर चालली आहे. मी अलीकडेच दसरा मेळाव्यात जाहीर केलंय की, मी निवडणूक किंवा मंत्रीमंडळ विस्तार यावर काही बोलणार नाही. मला यावर कसलीही चर्चा करायची नाही आणि प्रसारमाध्यमांनीही तशी चर्चा करू नये, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या ‘एबीपी माझा’शी बोलत होत्या.

हेही वाचा- पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील? एकनाथ खडसेंचं स्पष्ट विधान, म्हणाले…

औरंगाबाद जिल्ह्याला अनेकदा बाहेरचा पालकमंत्री मिळाला आहे. मात्र, बीडमध्ये कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी तेथील स्थानिक नेतेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. तुम्हाला बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला आवडेल का? असं विचारलं असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीड जिल्ह्याला आतापर्यंत दोन-तीन वेळा बाहेरचे पालकमंत्री मिळाले आहेत. बबनराव पाचपुतेही बीडचे पालकमंत्री होते.

हेही वाचा- “आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका!

खरं तर, मंत्रिमंडळातील नेत्यांचीच पालकमंत्रीपदी नियुक्ती केली जाते. पण मंत्रिमंडळात संबंधित जिल्ह्याचा कोणताही नेता नसेल तर स्वाभाविकपणे बाहेरचा पालकमंत्री मिळतो. पालकमंत्री कुणीही असो, त्यानं पालकाच्या भुमिकेत बीड जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष द्यावं, एवढीच माझी अपेक्षा आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.