RSS Magzine on Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाची मोठी हार झाली. महायुतीच्या जागांमध्ये मोठी घट होऊन त्यांना १७ जागांवर समाधान मानावे लागले होते. यामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची कामगिरी सर्वात निराशाजनक राहिली. त्यामुळे निकालानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित मासिक आणि मुखपत्रांमधून त्यांच्याविरोधात नाराजी सूर उमटलेला दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच ऑर्गनायझर या मुखपत्रातून अजित पवार यांच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. त्यानंतर आता संघाशी संबंधित असलेल्या विवेक या मराठी साप्ताहिकानेही अजित पवारांना महायुतीत घेतल्याबद्दल आक्षेप नोंदविला आहे.

‘कार्यकर्ता खचलेला नाही, तर संभ्रमात!’ या लेखात साप्ताहिक विवेकने लोकसभा निकालाची चिरफाड केली आहे. “लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही”, असा नाराजीचा सूर या लेखात दिसून आला.

हे वाचा >> Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का! शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष यांचा राजीनामा

भाजपालाच आता अजित पवार नकोसे?

शरद पवार गटाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी या विषयावर एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित मुखपत्राने दुसऱ्यांदा अजित पवार यांच्याविरोधात भाष्य केले आहे. याचाच अर्थ भाजपाला आता अजित पवार किंवा त्यांचा गट नकोसा झाला आहे. भाजपा फक्त दुसऱ्यांचे पक्ष आणि कुटुंब फोडते. त्यातून काही प्रमाणात मतांचा लाभ मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रातील जनतेने या राजकारणाला फाटा दिला. खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कोणता, हे लोकांनी दाखवून दिले आहे.”

eknath shinde fadnavis and ajit pawar expressed confidence on mahayuti victory in assembly polls
अजित पवार , देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे</figcaption>

हे ही वाचा >> “राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची युती भोवली”; संघाच्या ‘विवेक’ साप्ताहिकाने भाजपाला विचारले बोचरे प्रश्न

“अजित पवारांना बरोबर घेऊन फायदा तर काहीच नाही, उलट नुकसानच अधिक झाले, याची प्रचिती लोकसभेच्या निकालानंतर आता भाजपाला आली असावी. त्यामुळे भविष्यात त्यांना अशा लोकांना एकत्र घ्यायचे नसेल. पण भाजपाच नाही तर अजित पवार गटातील लोकांनाही आता या गटाबाबत साशंकता वाटत आहे. अजित पवारांच्या बारामतीमध्येच त्यांच्या उमेदवारांना लीड मिळू शकलेला नाही. याचाही विचार भाजपाने केला असेल”, असेही प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणाले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या विषयावर भाष्य केले. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत प्रश्न विचारला असताना त्या म्हणाल्या, ऑर्गनायझर नंतर आता साप्ताहिक विवेकने अजित पवारांच्या विरोधात लेख लिहिला आहे. त्यामुळे भाजपा आणि अजित पवार यांच्यात नेमके काय चालले आहे? याबाबत मी काही ठामपणे सांगू शकत नाही. याबद्दल ते दोन पक्ष बोलू शकतात.