घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकणाऱ्या भाजपाची राजेशाहीकडे वाटचाल चालली आहे अशी टीका आता काँग्रेसने केली आहे. विविध योजनांना नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. तसंच नरेंद्र मोदी यांचं नाव स्टेडियमलाही देण्यात आलं आहे. त्यावरून आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसतं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबाबत ट्विट करत भाजपाची वाटचाल ही राजेशाहीकडे चालली आहे असं म्हटलं आहे. नरेंद्र मोदी हे देश हुकूमशाहीच्या दिशेने नेत आहेत असं विरोधक कायमच म्हणतात त्यानंतर आता सचिन सावंत यांनी भाजपावर देश राजेशाहीच्या दिशेने जात असल्याचाही आरोप केला आहे.

काय म्हटलं आहे सचिन सावंत यांनी ?

घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश हळूहळू राजेशाहीकडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. लांगूलचालनाची भाजपाशासित राज्य सरकारांमध्ये चढाओढ लागली आहे. गुजरात, कर्नाटकमध्ये मोदींच्या नावाने योजना आल्या, स्टेडियम आलं. आता महाराष्ट्र सरकारनेही हयातीतच मोदींचे नाव योजनांना दिले आहे. आधी इराक, उत्तर कोरिया, रशियासारख्या काही देशात हे दिसलं होतं आता लवकरच सर्वत्र भारतात दिसेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सचिन सावंत यांनी अर्थसंकल्पातल्या योजनांची नावं ट्विट केली आहेत. ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी असा उल्लेख आहे. तसंच मोदी आवास घरकुल योजना असाही उल्लेख आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामधल्या तरतुदींची नावं ट्विट करत सचिन सावंत यांनी आपला देश हा राजेशाहीकडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे असा आरोप केला आहे.