सातारा: प्रहार जनशक्ती पार्टी व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांच्या वतीने साताऱ्यात गांधी मैदानावर रक्तदान आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न झाला. सध्याचे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन या महत्त्वपूर्ण विषयावर गप्प आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात काही बोलत नाहीत, असे प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू पाटील यांनी साताऱ्यात केला.
रात्री नऊ वाजता येथील गांधी मैदानावर या आंदोलनाची सुरुवात झाली. संघटनेच्यावतीने रक्तटंचाई भरून काढण्यासाठी साताऱ्यात संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले .रात्री नऊ वाजता बच्चू कडू यांनी साताऱ्यात येऊन थेट राज्य शासनाला प्रश्न विचारले, ते म्हणाले, कर्नाटक सरकारचा तीन लाख कोटीचा अर्भसंकल्प आहे, तरी शेतकऱ्यांसाठी ४५ हजार कोटीची तरतूद होते आणि महाराष्ट्रात सात लाख कोटी तरतूद असताना शेतकऱ्यांसाठी केवळ नऊ हजार कोटींची तरतूद होते.
दिव्यांग बांधवांसाठी मागच्या दोन वर्षात हजार कोटींची तरतूद असताना यंदा ४०० कोटीची तरतूद करण्यात आली. नक्की हे सरकार काय करते आहे. सातबारा कोरा करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादागिरी संपली आहे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दिव्यांग बांधवांचे मानधन वेळेत जमा झाले नाही तर वित्त विभागाच्या सचिवांचे पगार करणार नाहीत असे वचन मला अजित पवारांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात काहीच घडत नाही. प्रशासनावर वचक असणाऱ्या पवारांची दादागिरी गेली कुठे असाच सवाल त्यांनी केला.
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात प्रहार संघटना सर्वत्र आंदोलनाची सुरुवात करत आहे. त्याची सुरुवात छत्रपतींच्या भूमीतून केली. दि. २ जून रोजी वित्तमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आम्ही दहा हजार कार्यकर्ते शेतकरी जमवून अर्थसंकल्पाच्या मांडणीची चिरफाड करणार आहोत, असे बच्चू कडू यांनी सांगितले. राजवाडा गांधी मैदान या दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.