पनवेल येथे राहणाऱ्या दोघा अल्पवयीने बहीण-भावाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची खळबळ जनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या दोघांचे मृतदेह कसारा घाटात आढळून आल्याने या हत्येमागील गूढ वाढले आहे. जान्हवी नितीन शहा (१०) आणि पराग शहा (१२) अशी या भावंडांची नावे असून पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्या पालकांची चौकशी सुरू केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सहावीत शिकणारी जान्हवी आणि पाचवीत शिकणार तिचा भाऊ पराग गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. मंगळवारी सकाळी नाशिकहून मुंबई कडे येणाऱ्या महामार्गावरील कसारा घाटाच्या पायथ्याजवळ या दोघांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान शहापूरचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत वघुंटे यांनी तपासासाठी दोन पथके तयार करून शोध मोहीम सुरू केली असता ही दोन भावंडे पनवेल येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक तपासात या दोघांचाही हत्या गळा दाबून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी याप्रकरणी भावंडांच्या पालकांना ताब्यात घेतले आहे.