अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिका प्रशासनाला लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश दिला आहे. तसेच याबाबतचे प्रत्रकही लटके यांना द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयानंतर आता उद्धव ठाकरे गट उद्या (१४ ऑक्टोबर) शक्तीप्रदर्शन करत लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गट आणि भाजपावर कठोर शब्दांत टीका केली आहे. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटाला त्रास देण्याचे काम सुरू आहे. पण आम्ही या पोटनिवडणुकीत दाखवून देऊ, असे चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा >>> “मी तर लढाईचीच…” कोर्टातील खटल्यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड

मी न्यायदेवतेचे आभार व्यक्त करतो. न्यायदेवतेने दिलासा दिलेला आहे. पण शिंदे गट उद्धव ठाकरे यांना तसेच खऱ्या शिवसेनेला खूप छळत आहे. याच कारणामुळे राग, संताप येत आहे. काल ऋतुजा लटके यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यास सांगितले. शिंदे गट उद्धव ठाकरेंना कसा त्रास देतोय, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. लोक त्यांना याचा जाब विचारणार आहेत, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

हेही वाचा >>> “आता मर्द लोकांच्या हातात…” नियतीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे विधान

अगोदर असे राजकारण नव्हते. आता मात्र फार वाईट आणि घाण राजकारण केले जात आहे. उद्धव ठाकरे हे एक यशस्वी नेतृत्व आहे. अंधेरीतील भाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. अर्धा प्रचारही झालेला आहे. ऋतुजा लटके यांच्या पतींचा मृत्यू झालेला आहे. तसे पाहायचे झाले तर त्यांचा आधार गेला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. ऋतुजा लटके या नक्कीच निवडून येतील, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

न्यायालयाचा निर्णय काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उद्या सकाळी ११ पर्यंत याबाबतचे पत्र लटके यांना देण्यात यावं असं न्यायालयाने म्हटलं आहे. सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावलं असून तुमच्याकडे विशेषाधिकार असताना अशी प्रकरणं आमच्याकडे येता कामा नयेत असं सांगितलं आहे. न्यायालयाने पालिकेला राजीनामा स्वीकारणार की नाही याबद्दल २.३० वाजता भूमिका मांडण्यास सांगितलं होतं. पालिकेने भूमिका मांडल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.