महाराष्ट्राच्या राजकारणात २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे राजभवनावर झालेल्या शपथविधीने सर्वत्र खळबळ उडाली होती. विशेषता महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारणच यामुळे हादरलं होतं. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदाची शपथ दिली होती. मात्र त्यानंतर राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आणि वेगवान नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं आणि भाजपाला विरोधात बसावं लागलं. या पहाटेच्या शपथविधीबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं एक खळबळजनक विधान समोर आलं आहे. यावरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा तो शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.

यावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मला हे कळतच नाही की असे गौप्यस्फोट हे त्यावेळी का केले जात नाही. त्यामुळे अशा उशीरा सुचलेल्या शहाणपणाला, उशीरा मिळालेल्या माहितीला काहीच अर्थ नसतो. त्या एका अर्थाने संदर्भ नसलेल्या गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळे जयंत पाटील काय म्हणाले, मग कोणी माहितीच्या अधिकारात काय म्हणालं याला फार काही अर्थ नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले? –

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत असताना जयंत पाटील म्हणाले की, “मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात (२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर) राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठविण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आज महत्त्व नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या काळात त्यांनी स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही. आता शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे सरकार कोसळले. पण राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली, हे नाकारता येणार नाही.”