देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला. यापैकी तीन राज्यांमध्ये भाजपाने सत्ता मिळवली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपाने बहुमत मिळवलं आहे. तर, तेलंगणात काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. दरम्यान, या चार राज्यांच्या निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकीआधी होणारी पूर्वपरीक्षा म्हणून पाहिलं जात होतं. या पूर्वपरीक्षेत भाजपा उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. दुसऱ्या बाजूला, भाजपाने आगमी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात भाजपाप्रणित महायुतीने ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

भंडाऱ्यात भाजपाच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे संकल्प मांडले. बावनकुळे म्हणाले, आजच्या मेळाव्यात आपण पहिला संकल्प करायचा आहे की येत्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच मे २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे ४५ खासदार त्यांच्या समर्थनात असायला हवेत. त्यातला भंडाऱ्याचा खासदार सर्वाधिक मतांनी निवडून येऊन मोदी यांना पंतप्रधान करण्याकरता हात वर करून उभा असला पाहिजे.

हे ही वाचा >> “एकट्या छगन भुजबळचं ऐकून आमच्यावर कारवाई झाली तर…”, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आपला अजून एक संकल्प आहे. पुढच्या वर्षी, ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होईल. त्यानंतर ३० नोव्हेंबरच्या आत राज्यात नवीन सरकार बनेल. २०२४ ते २०२९ या पाच वर्षांसाठी राज्यात नवीन सरकार येईल. या नवीन सरकारसाठी पुन्हा एकदा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर… ऐकलं का सर्वांनी? यापूर्वी वानखेडेवर कोणाचा शपथविधी झाला होता? सर्व कार्यकर्त्यांनी दोन्ही हात वर करून सांगा तुमच्या मनात काय आहे? या महाराष्ट्रात पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर…देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली पाहिजे.” दरम्यान, बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांकडून अनेकदा या वाक्याची उजळणी करून घेतली.