“लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी झाली पाहिजे, अशी शिंदे सरकारची भूमिका आहे. मात्र, बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होता कामा नये, जर हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू”, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी दौऱ्यात शिंदे सरकारवर केली. यावरून भाजपा नेत्यांनी आता त्यांच्यावर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली आहे. नारायण राणे यांनी त्यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन टीका केलीच आहे, आता भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनीही त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत.

“अखेर उद्धव ठाकरेंच्या पोटातलं ओठावर आलं… ते ज्या कामात एक्सपर्ट आहे तेच बोलून दाखवलं. ज्या महाराष्ट्रानं तुम्हाला घडवलं तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करताय….?? तुम्हाला महाराष्ट्र घडवायचा नाही तर पेटवायचाय”, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.

हेही वाचा >> “…तर महाराष्ट्र पेटवू”, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर नारायण राणे म्हणाले, “हेलिकॉप्टरमधून मशाल घेऊन…”

“उद्धव ठाकरे तुम्ही महाराष्ट्राच्या मातीशी, आपल्या आईशी गद्दारी करताय, पण आम्ही तुमचे मनसुबे उधळून लावू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कर्तबगार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला लाभले आहेत. ज्यांनी तुमच्यासारख्या भल्याभल्यांना वठणीवर आणलंय”, असंही त्या म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नारायण राणेंची टीका

“बारसूत प्रस्तावित जागेत ठाकरे पोहोचले, त्यानंतर ते सोलगावला गेले. नंतर काही लोकांना भेटले. सभा कुठेही झाली नाही. त्यांच्या सभेला परवानगी नाकारली त्यामुळे मी माझा दौरा रद्द केला. उद्धव ठाकरे बरंच काही बडबडले आहेत. त्यात त्यांनी अनेक धमक्या दिल्या. महाराष्ट्र पेटवीन वगैरे वाक्य आहेत त्यांची. पण उद्धव ठाकरे आज स्वतः कोण आहेत, याची जाणीव त्यांना आहे का माहीत नाही. तसं जे म्हणताहेत की प्रकल्प जर उद्या सुरू केला, हुकुमशाही करून सुरू केला तर आम्ही महाराष्ट्र पेटवू असं त्यांचं वाक्य आहे. ४० आमदार गेले. १०-१२ आमदारच असतील आता. महाराष्ट्रात सर्वांत कमी ताकदीचा पक्ष म्हणजे शिवसेना”, असं नारायण राणे म्हणाले.