नगर : मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्या नगर भेटीनंतर नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू होण्याबाबत संघटनांनी दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात केली आहे. नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न लवकर सुटेल, असे आश्वासन लाहोटी यांनी दिल्याचा दावा जिल्हा प्रवासी संघटनेने केला आहे. तर, गेल्या काही दिवसांपासून याबाबत दिशाभूल केली जात असल्याचा दावा करत जागरूक नागरिक मंचने, असा कोणताही प्रस्ताव रेल्वेच्या सध्या विचाराधीन नाही, असे लाहोटी यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले.
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी आज नगरमध्ये रेल्वे स्थानकाच्या तपासणीसाठी दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांची विविध संघटनांनी भेट घेतली. त्यानंतर हे दावे-प्रतिदावे सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा प्रवासी संघटनेचे अशोक कानडे, वसंत लोढा, संदेश रपारिया आदींनी लाहोटी यांची भेट घेतली. त्या वेळी लाहोटी यांनी ‘नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे जरूर करेंगे’ अशा शब्दात शिष्टमंडळाला आश्वासन दिल्याचे संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे. संघटनेने नमूद केले,की गेल्या बारा वर्षांपासून रेल्वे सल्लागार समिती व संघटना नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी पाठपुरावा करत आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यामध्ये दौंड येथील कॉड लाईनह्ण व त्या ठिकाणी असणारी तिकीट विक्री सुविधा उपलब्ध करण्यात संघटनेचे यशस्वी पाठपुरावा केला आहे. मनमाड-दौंड रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यासाठीही संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. लाहोटी त्यांनी नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न लवकरच सुटेल असे आश्वासन दिल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या दोनतीन आठवडय़ापासून लवकरच नगर-पुणे शटल सव्र्हिस सुरू होण्याचे आश्वासन सोलापूर विभागाच्या व्यवस्थापकांनी रेल्वे सल्लागार समितीला दिल्याच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या शहरामध्ये पसरवल्या जात होत्या, त्या चुकीच्या असल्याचे लाहोटी यांच्या भेटीनंतर स्पष्ट झाल्याचा दावा जागरुक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी केला आहे. मुळे यांनी सांगितले,की महाप्रबंधक लाहोटी यांच्यासमवेत आमदार संग्राम जगताप, नगरसेवक अविनाश घुले, दत्ता गायकवाड, कैलास दळवी, दत्ता वामन, सुरेखा सांगळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी लाहोटी यांनी असा कुठलाही प्रस्ताव अद्याप विचाराधीन नाही, जागरुक नागरिक मंचने आत्ता दिलेल्या प्रस्तावावर विचार केला जाईल, कारण यापूर्वी असा कोणताही माझ्याकडे प्रस्ताव आला नाही, असे स्पष्ट केले. आपण लाहोटी यांना नगर-पुणे प्रवासी व मालवाहतूक बाबत माहिती दिली, त्या प्रस्तावाच्या आधारावर लाहोटी यांनी विचार करण्याचे आश्वासन दिल्याचा दावाही मुळे यांनी केला आहे.