Devendra Fadnavis On Supriya Sule : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झालेले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच राजकारण तापलं आहे.
या संदर्भात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या २०१८ च्या एका भाषणाचा दाखलाही सुप्रिया सुळे यांनी दिला होता. दरम्यान, त्यांच्या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणं बंद करा’ अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वांना माझी विनंती आहे की सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणं बंद केलं पाहिजे. कारण त्यामधून आपलचं तोंड पोळतं. दुसरं एक महत्वाचं आहे की सुप्रिया सुळे यांनी स्वत:ला एक प्रश्न विचारला पाहिजे की मराठा समाजाचे प्रश्न एवढे का चिघळले? त्यावर मार्ग कोणी काढला? त्यांच्या काळात त्यावर मार्ग निघाला का? उलट त्यांचं अडीच वर्षांचं (महाविकास आघाडी) सरकार असताना त्यांनी मराठा समाजासाठी एकही निर्णय घेतला नाही. जे निर्णय झाले ते मी आणि एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी राजकीय पोळी भाजणं बंद केलं पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
“मी प्रवासात असल्यामुळे उच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे हे पूर्ण ऐकलं नाही. मात्र, मला जे समजलं त्यात उच्च न्यायालयाने हेच सांगितलं आहे की आंदोलनासाठी जी परवानगी होती, ती परवानगी काही अटी शर्तींसह होती. मात्र, या अटी शर्तींचं उल्लंघन झालेलं आहे. विशेषत: रस्त्यावर ज्या गोष्टी सुरू आहेत, त्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे आणि न्यायालयाने त्याबाबत काही निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करणं प्रशासनाला क्रमप्राप्त आहे आणि प्रशासन न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करेन”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
बैठकीत काय चर्चा झाली?
“बैठकीत आम्ही सर्व कायदेशीर मार्गांचा विचार केला. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काही मार्ग काढता येतील का? तसेच कायदेशीररित्या ते न्यायालयात कसे टिकतील? या संदर्भातील चर्चा झाली आहे. त्याबाबत आम्ही अधिकची काही माहिती मागवली आहे. कायदेशीर काही मार्ग निघत असतील तर कायदेशीर मार्ग काढण्याची आमची मानसिकता आहे. त्यावर आम्ही काम करत आहोत”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“काही ठिकाणी बंद आणि रास्ता रोको झाले. पण त्या ठिकाणी लगेचच पोलिसांनी ते रस्ते रिकामे केले. तसेच काही घटना अशा घडल्या की त्या घटना भूषणावह नाहीत. अशा प्रकारची अपेक्षा आंदोलकांकडून नाही. त्याच समर्थन होऊ शकत नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे लोक आहोत. उच्च न्यायालयानेही या आंदोलनाची माहिती घेतली. सरकारचाही हा प्रयत्न असतो की कोणत्याही गोष्टी सामंजस्याने झाल्या पाहिजेत. पण न्यायालयाने कडक आदेश दिल्यानंतर आता प्रशासनाने ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती कारवाई प्रशासनाला करावी लागेल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.