परभणी: राज्यात अनेक शेतकरी नवनव्या वाणांच्या निर्मितीपासून ते पीक पद्धती, अवजारे, लागवड यासंदर्भात कल्पकतेने काम करताना दिसतात. त्यांचे कामही शास्त्रज्ञांएवढेच मोलाचे आहे. राज्यातल्या सगळ्याच विद्यापीठांनी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना निवडून ‘मानद कृषी संशोधक’ म्हणून सन्मानित करावे. प्रत्येक विद्यापीठाने दरवर्षी पाच शेतकऱ्यांचा या पद्धतीने गौरव करावा व त्यांचे कार्य सर्व शेतकऱ्यांसमोर आणावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठांच्या ५३ व्या संयुक्त कृषी संशोधन विकास समितीच्या बैठकीचे उद्घाटन आज येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, राजेश विटेकर, रत्नाकर गुट्टे, सतीश चव्हाण आदींसह राज्यातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, अधिकारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी शेती क्षेत्रातील आव्हानांचा वेध घेतला. राज्यात आज ७९ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. पावसाची अनियमितता, वातावरणातल्या बदलामुळे पारंपरिक पद्धतीने शेती करता येत नाही.

शेती क्षेत्रात गुंतवणूक करण्याची शेतकऱ्यांची क्षमता कमी होत चालली आहे, शेतकरी दुष्टचक्रात अडकत आहेत. अशावेळी नवनव्या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीत झाला पाहिजे. सध्या उसाच्या क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने या पिकाची उत्पादकता वाढली आहे. कृषी विद्यापीठांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पिकांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यातून नवे मॉडेल विकसित करावे अशी अपेक्षाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

शेती क्षेत्रातील ‘ड्रोन’चा वापर वाढण्याची आवश्यकता असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषी अवजारे परवडत नसल्याने अवजारांची बँक निर्माण झाली पाहिजे, याचा शेतकऱ्यांना उपयोग होईल असे सांगून ‘ॲग्रीस्टॅक’च्या माध्यमातून सव्वा कोटी शेतकऱ्यांचे डिजिटायझेशन होत असल्याने त्याचा उपयोग शेती क्षेत्रातल्या वस्तुनिष्ठ माहितीच्या अनुषंगाने संशोधन व धोरणांच्या अंमलबजावणीसाठी होईल असे फडणवीस यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तसेच सेलू येथील महावितरणच्या १३२ विद्युत केंद्राचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडले. याप्रसंगी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी विद्यापीठांनी कोरडवाहू शेतीसाठी नवनवीन वाण विकसित करावे असे सांगून रासायनिक शेती ही सध्या अनेक रोगांना आमंत्रण देणारी असल्याने जनतेला चांगल्या दर्जाचे अन्न मिळण्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असे आवाहन केले. यावेळी मंत्री जयस्वाल, प्रधान कृषी सचिव रस्तोगी यांची भाषणे झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी कृषी विद्यापीठातील विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमात चारही कृषी विद्यापीठातील प्रत्येकी एका कृषीतज्ञांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने काढण्यात आलेल्या विविध घडी पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. आजपासून तीन दिवस ही बैठक चालणार आहे.