CM Eknath Shinde on MVA Bandh : बदलापूर प्रकरणी राज्यभर संतापाचं वातावरण असून महाविकास आघाडीकडून आज (२४ ऑगस्ट) संप पुकारण्यात आला होता. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने या संपाला विरोध केल्याने महाविकास आघाडीने हा संप मागे घेऊन निषेध नोंदवला. यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ते आज यवतमाळ येथे आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ – प्रचार व प्रसार कार्यक्रमात बोलत होते.

“विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी आणल्या, लाडक्या भावांचं काय? आपण लाडके भाऊही आणले. सुशिक्षित बेरोजगारांना काम देण्याचं काम केलं. आता तीन सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटी हा संसाराचा गाढा कसा चालवायचा, कुटुंब कसं चालवायचं याची चिंता भगिनींना आहे. महिना कसा घालावयाचा. मी गरिबी पाहिली आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“तुम्ही आमच्या महायुतीला ताकद द्याल तर दीड हजाराचे दोन हजार होतील. बळ आणखी वाढवलं तर चार हजारही होतील. आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी कंटेनर घरात पैसे नेले. पण घरी नेणारे नाही तर, आम्ही तुम्हाला मदत करणारे आहोत”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> मुख्यमंत्र्यांनी ‘खात्यात पैसे आले का’ विचारताच महिलांचा गोंधळ…अखेर भाषण थांबवून….

विरोधकांविरोधात बोलताना ते म्हणाले, “आज तोंडाला पट्टे बांधून बसले आहेत. लोकशाहीत आंदोलनाला मनाई नाही. पण आंदोलनाच्या नावाखाली समाजाला वेठीस धरता येणार नाही. आम्ही सांगितलं की न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याचं पालन सरकार करेल. पण कोर्टाने त्यांच्या विरोधात निकाल दिल्याने त्यांनी कोर्टावर आरोप केले, ताशेरे मारले. तुम्ही कोर्टाला बदनाम करता. सुप्रीम कोर्टाला बदनमा करता. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे निर्णय झाला की व्यवस्था चांगली. निर्णय विरोधात गेला की व्यवस्था वाईट. असं कधी लोकशाहीत कधी पाहिलंय का? तुम्ही तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ आली नसती”, अशी टीकाही त्यांनी केली.

आम्ही फक्त देण्याचं काम केलंय

“साधूंचं हत्याकांड झालं तेव्हा तोंडावर पट्टी, करोनात बॉडीबॅग भ्रष्ट्राचार, खिचडीत भ्रष्टाचारा झाला तेव्हा तोंडावर पट्टी. तेव्हा कंत्राटदाराबरोबर गट्टी होती. चौकात बसून राजकारण करणाऱ्यांना कधीतरी औकात दाखवल्याशिवाय राहणार नाही. भ्रष्टाचारात ज्यांची तोंड काळे झाले त्यांच्या हातात शोभतात काळे झेंडे. आम्ही फक्त देण्याचं काम केलंय. आम्ही फक्त या राज्यातील सर्वसामान्य लोकांना काय मिळालं पाहिजे, काय दिलं पाहिजे हा निर्णय घेतोय”, असंही ते म्हणाले.

बंदच्या मागून काहीतरी अघटीत घडण्याचं कारस्थान

“विरोधक वेडे झालेत, पागल झालेत. आपल्या या योजनेमध्ये एवढ्या गतीने कोणी पैसे दिले होते का? विरोधक वारंवार बांगलादेशचं उदाहरण देत आहेत. हा महाराष्ट्र आहे. बांगलादेशसारखी आरजकता माजवायची आहे का? काय तुमचं म्हणणं आहे. या बंदच्या मागून काहीतरी अघटीत या महाराष्ट्रात घडवण्याचं कारस्थान सुरू आहे”, असा आरोपही त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं त्यापेक्षाही दुर्दैवी

“तुम्हाला या योजना बघवत नाहीत. बदलापूरला झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. वेदना देणारी आहे. अशा नराधमांना मृत्यूदंड दिला पाहिजे, अशाप्रकारची भावना सरकारची आहे. पण तुम्ही राजकारण करत आहात. दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं यापेक्षा दुर्दैवी आहे. कुठे फेडणार हे पाप.. असं कधी आंदोलन असतं? आठ-दहा तास आंदोलन असतं का? रेल्वे रोखून ठेवणं. नवनवीन टीम येत होती. पोलिसांकडून माहिती मिळत होती. नवीन टीम बोलावून आंदोलन सुरू ठेवलं जात होतं. गिरीश महाजन गेले. आंदोलक अटक करा म्हणाले, अटक केली. कलम लावा म्हणाले, कलम लावले. एसआयटी लावली. संस्थेवर कारवाई केली. सरकारी वकील नेमले. फास्ट ट्रॅकवर केस घेतली. फाशीची शिक्षा मागितली”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.