राज्यातील सत्तासंघर्षाच्या नवव्या दिवशी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंनी पद सोडल्यानंतर भाजपाने एकच जल्लोष साजरा केला. विरोधी पक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेढा भरवल्याची दृष्य समोर आली आहेत. मुंबईमध्ये बहुमत चाचणीसाठी आमदार जमलेल्या ताज प्रेसिडेन्स हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम यासारख्या घोषणा देत जल्लोष साजरा केला.

नक्की वाचा >> CM Uddhav Thackeray Resign: निरोपाच्या भाषणात नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे; वाचा त्यांचं राजीनाम्याचं भाषण

‘हमारा नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो’, ‘राज तिलक की करो तयारी, आ रहे है भगवाधारी’, ‘देवेंद्रजी अंगार है बाकी सब भंगार है’ अशा घोषणा देत देवेंद्र फडणवीसांचा जयजयकार भाजपा समर्थकांनी केला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केले होते. शिंदे यांच्या बंडानंतर भाजपाने प्रथमच या राजकीय लढाईत उडी घेतल्याचं दिसून आलं. 

पाहा व्हिडीओ –

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दिल्लीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन रात्री मुंबईत परतले. त्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ‘‘शिवसेनेच्या ३९ आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. याशिवाय काही अपक्षांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. ४६ आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे,’’ अशी मागणी भाजपाने केली होती.

त्यानंतर आज सकाळी राज्यपालांनी यासंदर्भातील निर्देश जारी करत उद्या म्हणजेच ३० जून रोजी बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं होतं. याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायलयाने या प्रकरणामध्ये रात्री ९ वाजता निकाल देताना उद्याच बहुमत चाचणी होईल असं म्हटलं. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांमध्ये उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हवरुन राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.

काल रात्री राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेचे ३९ आमदार महाविकास आघाडीबरोबर नाहीत किंवा त्यांचा या सरकारला पाठिंबा नाही. या साऱ्या घडामोडींमुळे राज्यपालांना पत्र सादर केल्याचे फडणवीस यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले होतं.