पंढरपूर : वारकरी संप्रदायात चंद्रभागा स्नानाला महत्त्व आहे. सध्याची स्थिती पाहता नदी पात्रातील पाण्याची झपाट्याने वाढ होत आहे. वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी नदी पात्रात किती पाण्याचा विसर्ग करावा, वाळवंट किती शिल्लक ठेवावे आदीबाबत पूरनियंत्रण आराखडा तयार करून त्वरित सादर करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. के. हरसुरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त पुलकुंडवार म्हणाले, चंद्रभागा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेऊन वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. वारकरी-भाविकांना तसेच दिंड्यांना वाहतुकीचा कोणाताही त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील व शहरातील अतिक्रमण तत्काळ काढावीत. पालखी मार्ग व शहरातील अधिकृत होर्डीगचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. तसेच अनधिकृत होर्डींगवर तत्काळ कारवाई करून पुन्हा ते होर्डीग लागणार याची दक्षता घ्यावी. होर्डीगमुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, यावर्षी पाऊस जास्त असण्याची शक्यता असल्याने पालखी तळांवर चिखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्वच पालखी तळांवर मुरमीकरण करण्यात येत आहे. तसेच वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी पालखी मार्गावर वॉटरप्रूफ मंडप, जर्मन हँगर लावण्यात येणार आहेत. महिला भाविकांसाठी स्नानगृहांची संख्या वाढवण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गर्दी व्यवस्थापन, चंद्रभागा नदी पात्रात होडीतून होणारी जलप्रवासी वाहतूक आदीबाबत आवश्यक नियोजन करण्यात आले असून, होडीच्या चालकांना व मालकांना होडीत जलप्रवासी वाहतुकीसाठी एकूण १ हजार ५० लाइफ जॅकेटची उपलब्धता करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी सांगितले. तसेच वारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे. यंदाच्या वारीचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गेल्या दीड महिन्यापासून नियोजन केले आहे. तसेच दरवर्षी कराव्या लागणारी कामे कायमस्वरूपी करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.