“भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संलग्न संघटनांकडून देशात धृवीकरणाच्या राजकारणाकरीता ‘हिंदू खतरें में,’ असे उर बडवून सांगितले जात असताना मोदींच्या राज्यात खरेच ‘हिंदू खतरें में’, अशी स्थिती झाली आहे,” असे म्हणावे लागते. “देशातील बँकांमध्ये असणारा पैसा हा बहुसंख्य हिंदूंचाच असून तो सुरक्षित राहिलेला तर नाहीच पण अनेक कुटुंबंही उद्धस्त झाली आहेत. त्याला मोदी सरकारच जबाबदार आहे,” असं म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सावंत पुढे म्हणाले की, “येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याने या बँकेत ठेवलेले पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. याआधी पंजाब महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्यामुळे आयुष्यभराची कमाई बुडाली. आपला पैसा बुडाला या धास्तीने काहीजणांचे मृत्यूही ओढवले. नोटबंदीमध्ये कोट्यवधी लोक रस्त्यावर आले, यात जवळपास १५० लोकांचा जीव गेला, त्यातही बहुसंख्य हिंदूच होते.”

“देशात आत्महत्या करणारे तरुण व शेतकरी आत्महत्यांमध्येही बहुसंख्य हिंदूच आहेत. आता तिच वेळ येस बँकेत पैसा असलेल्या लोकांवर आलेली आहे. या बँकांमध्ये पैसे गुंतवणारे बहुसंख्य हिंदूच आहेत. या बँकेतील लोकांची गुंतवणूक तर धोक्यात आलीच परंतु या संकटाने हिंदूंच्या देवालाही सोडले नाही. पुरीच्या भगवान जगन्नाथ मंदिराचे विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असलेले ५४५ कोटी रुपये एक महिन्याआधी याच येस बँकेत जमा करण्यात आले होते. ते पैसेही आता बुडीतच जमा झाले आहेत. यात भगवान जगन्नाथ ही संकटात आले आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

“नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या बँकांचे करोडो रुपये लुटुन पळून गेले तो पैसाही या देशातील बहुसंख्य हिंदूंचाच होता. या येस बँकेत १८२३८ कर्मचारी असून यातील जवळपास सर्वच हिंदू आहेत त्यांची नोकरीही धोक्यात आली आहे. याला सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असून त्यांच्याच निष्र्किय कारभाराचा फकटा या हिंदूंना बसला आहे. मोदींच्या अशा कारभाराचा फटका हा या देशातील बहुसंख्य हिंदूंनाच बसत असताना काहीही कारवाई केली जात नाही. हे भीषण वास्तव पाहता हिंदूंना इतर कोणापासून नाही तर मोदी सरकारपासूनच जास्त धोका असून त्यांच्या नाकर्तेपणामुळेच हिंदूंची कष्टाची कमाई बुडाली तर आहेच पण अनेकजण रस्त्यावरही आलेत,” असेही सावंत म्हणाले.

“येस बँकेवर निर्बंध घातल्याने महाराष्ट्रील १०९ बँका अडचणीत आल्या असून यात विदर्भातील मध्यवर्ती बँकांसह काही सहकारी बँका तसेच पतसंस्थांच्या ठेवीही याच बँकेत होत्या त्या आता अडचणीत सापडल्या आहेत. परंतु बडोदा महानगरपालिकेच्या बडोदा स्मार्ट डेव्हलमेंट कंपनीचे २६५ कोटी रुपये येस बँकेवर निर्बंध घालण्याच्या एक दिवसाआधीच काढून घेण्यात आले यातून मोदी-शहा यांना देशाची नव्हे तर फक्त गुजरातचीच काळजी असते हे पुन्हा एकदा दिसून आले,” असल्याचे ते म्हणाले. “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. या महानगरपालिकेचे ९०५ कोटी रुपये येस बँकेत आहेत. मोदी-शहांनी बडोदा महापालिकेसारखेच किमान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कानात जरी सांगितले असते तरी ते या संकटातून वाचले असते. पण गुजरातप्रेमापुढे त्यांना इतर कोणी दिसत नाही असेच म्हणावे लागते,” असा टोलाही सावंत यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader sachin sawant criticize pm narendra modi yes bank crisis jud
First published on: 07-03-2020 at 13:49 IST