करोना विषाणू संसर्गावर सध्या एकमेव प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाचा पर्याय सांगितला जात आहे. त्यामुळेच आता पहिल्या दोन डोसनंतर आता भारतातही परदेशाप्रमाणे तिसऱ्या बुस्टर डोसला सुरूवात झालीय. मात्र, यावरूनच काँग्रसच्या एका खासदारांनी लोकांनी आयुष्यभर बुस्टर डोस घेत रहायचं का? असा सवाल करत राज्यातील ठाकरे सरकारला घरचा आहेर दिलाय. या खासदारांचं नाव आहे बाळू धानोरकर. त्यांनी करोना नियंत्रणात राज्य आणि केंद्र दोघेही अपयशी ठरल्याचा आरोप केला. तसेच केंद्रातील मोदी सरकारवरही कायम स्वरुपी उपाययोजना न केल्याच्या मुद्द्यावर टीका केली.

खासदार बाळू धानोरकर म्हणाले, “आता उपाययोजना करणं हा विषय राहिलेला नाही. मागील २ वर्षांपासून आपण फक्त उपाययोजना-उपाययोजना म्हणतो आहे. कोविडवर अचूक असं कोणतं औषध आहे? ओमायक्रॉनवर कोणतं औषधं आहे? तुमच्या प्रयोगशाळा काय करत आहेत? केंद्र सरकारच्या प्रयोगशाळा काय करत आहेत? राज्य सरकारच्या प्रयोगशाळा काय करत आहेत? आजही आपण दुसऱ्या देशाने पाठवलेल्या लसींवर बोलतो आहे.”

“लस घेतल्यावर विषाणूवर किती दिवस नियंत्रण असेल?”

“आपण परदेशात पाहतो की तीनदा लस घेतली, चारदा लस घेतली. फक्त लस हा विषय नाही. लस दिली म्हणजे त्या विषाणूवर नियंत्रण आलं का? लस घेतल्यावर विषाणूवर किती दिवस नियंत्रण असेल यावर आजही केंद्र आणि राज्य सरकार बोलत नाही,” असं त्यांनी सांगितलं.

“आज सरकारकडे लसी उपलब्ध नाहीत म्हणून ते ९ महिने लस कार्यरत राहिल असं सांगतात”

लसीकरण २ महिन्यासाठी आहे की ३ महिन्यासाठी आहे की ६ महिन्यासाठी? आधी म्हणाले ३ महिन्यासाठी आहे, मग सांगितलं ६ महिन्यासाठी आहे. आज सरकारकडे लसी उपलब्ध नाहीत म्हणून हे सांगतात ९ महिन्यापर्यंत हे लसीकरण कार्यरत आहे. याला काय अर्थ आहे,” असंही मत बाळू धानोरकर यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “मास्क आरोग्यासाठी त्रासदायक, जास्त वापरू नका”, काँग्रेस आमदाराचा अजब दावा! करोना चाचणीवरही अविश्वास!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी बाळू धानोरकर यांनी शाळा बंद करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तसेच लोकांनी आयुष्यभर बुस्टर डोसच घेत रहायचं का? असा सवाल करत राज्यातील ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला.