अहिल्यानगरः राज्यातील ‘ट्रिपल सीट’ सरकार हे जुलमी सरकार असून ते औरंगजेबाच्या विचाराने चालत आहे. आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखे लढायचे आहे, या माध्यमातून पुन्हा काँग्रेसचे गत वैभव निर्माण करून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

श्री. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच आज, शुक्रवारी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सपकाळ उद्या, शनिवारपासून मस्साजोग ते बीड अशी सद्भावना यात्रा सुरू करत आहेत. मस्साजोग येथे जाण्यापूर्वी सपकाळ यांनी आज आदर्शगाव हिवरेबाजार येथे जाऊन पद्मश्री पोपटराव पवार यांची भेट घेतली. अहिल्यानगर शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर ते मढी (ता. पाथर्डी) येथे रवाना झाले. त्यांच्यासमवेत प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, माजी महापौर दीप चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हणले, की, केंद्र व राज्य सरकार संविधान विरोधी वागत आहे. इंग्रजांसारखे तोडा-फोडा राजकारण त्यांनी स्वीकारलेले आहे. सामाजिक तेढ व पैशाचा वापर करून लोकशाही मूल्यांना धक्का लावत आहे. सामाजिक ध्रुवीकरण केले जात आहे. त्यांच्या कारभाराचा परिणाम होणार आका, कोयता, राख, वाळू अशा गॅंग तयार झाल्या आहेत. त्यातून राज्यात द्वेष, भय, गुंडागर्दी असे वातावरण निर्माण झाले आहे.या विरोधात समता, बंधुत्व अशी मूल्य प्रस्थापित करण्यासाठी आपली सद्भावना यात्रा आहे. हीच काँग्रेसची विचारधारा आहे. सत्ताधाऱ्यांना विचारधारेची काही देणेघेणे नाही. त्यामुळे सत्तेतील तिन्ही पक्षांची रोज भांडणे सुरू आहेत.

निवडणुकीत जय-पराजय सुरूच असतो. काँग्रेस मतांसाठी राजकारण करत नाही. समाजाला भयमुक्त करण्यासाठी, ज्वलंत प्रश्नासाठी लढणे ही काँग्रेसची विचारधारा आहे. तिचे पालन आम्ही करणार असेही सपकाळ म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रमुखांची अनुपस्थिती

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ प्रथमच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतानाही माजी मंत्री, आजी-माजी आमदार, प्रमुख पदाधिकारी स्वागतास अनुपस्थित होते. अनेक पदाधिकारी सपकाळ निघून गेल्यानंतर बैठकस्थळी पोहोचले. आम्हाला आज सकाळी निरोप देण्यात आले, असे काहीजण सांगत होते. सपकाळ यांचा अहिल्यानगर शहरात नियोजित दौरा नव्हता, ऐनवेळी तो ठरला, असे समर्थन काही पदाधिकारी करत होते.