गत आठ दिवसांपासून नळाला येत असलेल्या दूषित पाण्याबाबत निवेदन देऊनही इचलकरंजी पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून गुरुवारी संतप्त भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेचे उपमुख्याधिकारी श्रीराम गोडबोले यांच्या अंगावर दूषित पाणी ओतत आपला संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे पालिका कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन करून पालिकेच्या प्रवेशद्वारात घोषणाबाजी सुरू केली. तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिघोषणा सुरू केल्याने गोंधळ उडून तणाव निर्माण झाला होता. अखेर दोन्ही बाजूंची समजूत काढल्याने वातावरण शांत झाले.
येथील बालाजी अपार्टमेंट, लायन्स ब्लड बँक आणि दाते मळा परिसरात आठ दिवसांपासून नळाला रसायनयुक्त काळेशार पाणी येत आहे. या संदर्भात या भागातील नागरिकांसह भाजपाचे शहराध्यक्ष विलास रानडे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यावर प्रशासनाने तत्काळ कार्यवाई करण्याचे आश्वासन दिले होते. पण चार दिवस उलटले तरी परिस्थिती तशीच राहिल्याने गुरुवारी या भागातील नागरिकांनी विलास रानडे, वैशाली नाईकवडे, पांडुरंग म्हातुकडे, वृषभ जैन, सारिका भोकरे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेकडे धाव घेतली. मुख्याधिकारी सुनिल पवार यांच्या दालनात ठिय्या मारून ही माहिती दिली. तसेच जलअभियंता बापूसो चौधरी यांना बोलावण्याचा आग्रह धरला. पण ब-याच प्रतीक्षेनंतरही चौधरी फिरकले नाहीत. त्यामुळे उपमुख्याधिकारी श्रीराम गोडबोले हे चच्रेसाठी आले. चच्रेदरम्यान संतप्त झालेल्या म्हातुकडे यांनी नळाला आलेल्या दूषित पाण्याची  बाटली गोडबोले यांच्या थेट अंगावर ओतली.
अचानक झालेल्या प्रकाराने गोडबोले यांनी त्या अवस्थेतच मुख्याधिकारी यांच्या दालनातून काढता पाय घेतला. तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने पालिकेचे आवार दणाणून गेले होते. दरम्यान, उपमुख्याधिका-यांच्या अंगावर दूषित पाणी ओतल्याचे समजताच पालिकेचे सर्व कर्मचारी एकत्र जमले. कामबंद आंदोलन पुकारत पालिकेच्या प्रवेशद्वारात जाऊन घोषणाबाजी सुरू केली. संतप्त नागरिक, भाजपाचे कार्यकत्रे व पालिका कर्मचारी एकमेकांसमोर आले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी पालिकेत धाव घेतली. त्याचवेळी माजी आमदार अशोकराव जांभळे, पाणी पुरवठा सभापती रवी रजपुते, सागर चाळके आदींनी दोन्ही बाजूंच्या पदाधिका-यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दोघांचीही समजूत काढून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
भाजपाचे शहराध्यक्ष रानडे यांनीही कर्मचा-यांना कामबंद आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार कर्मचा-यांनी पुन्हा काम सुरू करून झाल्यावर वादावर पडदा टाकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contaminated water poured on the body of officer in ichalkaranji
First published on: 15-05-2015 at 03:30 IST