नाशिकच्या अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबत तोडगा काढण्यासाठी शास्रार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, याठिकाणी दोन्ही बाजूच्या महंतांकडून बसण्याच्या जागेवरून चांगलीच खडाजंगी झालेली पहायला मिळाली. अक्षरश: दोन्ही बाजूचे महंत हमरीतुमरीवर उतल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे सभेचा मूळ विषय बाजूलाच राहिला आणि काही वेळ मानअपमानाचा गोंधळ उडाला होता.

सभेच्या सुरुवातीलाच वाद
सभेच्या सुरुवातीलाच महंत गोविंदानंद महाराज आणि नाशिकच्या महंतांमध्ये वाद निर्माण झाला. गोविंदानंद महाराज सिंहासनावर बसले होते. तर नाशिकच्या महंतांनी आम्ही गोविंदानंद महाराजांसमोर खाली बसणार नाही. त्यांनी आमच्यासोबत खाली बसून चर्चा करावी, अशी मागणी केली होती. जवळजवळ एक तास वाद सुरु होता. त्यानंतर गोविंदानंद महाराजांसह इतर महंत खाली बसले आणि मग सभेला सुरुवात झाली.

काय आहे प्रकरण?
कर्नाटक येथील किष्किंधाचे मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी अंजनेरी ही हनुमान जन्मभूमी नसून किष्किंधा ही हनुमानाची जन्मभूमी असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी वाल्मिकी रामायणाचा दाखला दिला आहे. त्यांनी नाशिकच्या साधू, महंतांना अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे सिध्द करण्याचे आव्हान दिल्यानंतर या आव्हानाचा स्विकार करत नाशिकच्या साधू, महंतासह गावकरी एकत्र झाले आहेत. स्थानिक महंत आणि अभ्यासकांनी अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा करीत पुराव्यानिशी सिद्धतेची तयारी केली आहे. हनुमानाच्या जन्मस्थळाबाबत गोविदानंद सरस्वती यांनी शास्त्रोक्त चर्चेचे दिलेले आव्हान अनेकांनी स्वीकारले आहे.