गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या करोना निर्बंधांबाबत आज राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. यासोबतच, मास्क वापरणं देखील सक्तीचं नसून ऐच्छिक असेल, असं जाहीर करण्यात आलं आहे. येत्या २ एप्रिलपासून अर्थात गुढी पाडव्यापासून हा निर्णय लागू होईल. मात्र, या निर्णयावरून भाजपानं राज्यातील ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "फक्त स्वत:च्या अंगावर शेकू नये म्हणून…" भाजपा आमदार आशिष शेलार यांनी निर्बंध उठवण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारला सुनावलं आहे. "या सरकारला झुकावं लागलं. परवानगी द्यावी लागली. दुर्दैवं हे आहे की हिंदू सणांना परवानगी द्या यासाठी मागणी करावी लागते. तीही महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारसमोर. जेव्हा लोकांमध्ये प्रतिक्रिया यायला लागल्या, तेव्हा केवळ स्वत:च्या अंगावर शेकू नये, म्हणून आजचा कॅबिनेटचा निर्णय झाला आहे", असं आशिष शेलार म्हणाले आहेत. "ठाकरे सरकारला दिल्लीच्या परवानगीची गरज?" "हा निर्णय स्वेच्छेनं झाला असावा, असं आम्हाला वाटत नाही. २ तारखेला गुढी पाडवा आहे. मग या निर्णयाला इतका उशीर का झाला? या आधीच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय का नाही घेतला गेला? हा मुद्दा आम्ही अधिवेशनात उपस्थित केला होता. पण आता वाटतंय जणूकाही या परवानग्या ठाकरे सरकारला देण्यासाठी दिल्लीच्या कुणाचीतरी परवानगी आवश्यक आहे का? दिल्लीतल्या एका पक्षाच्या मुख्यालयातून सहमती मिळाल्यानंतर परवानग्या येत आहेत का?" असा सवाल देखील आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. मोठी बातमी! राज्यातील करोनाचे सर्व निर्बंध हटवले; आता मास्क देखील ऐच्छिक! "परवानग्या देण्यासाठी उशीर केला आहे. तो जाणून-बुजून केला आहे. या शोभायात्रा, मिरवणुका त्याच जोमाने होती. समाजात तो उत्साह आजही आहे. त्यात भाजपा सहभागी होणार आहे", असं देखील शेलार यांनी नमूद केलं. “मास्कचा वापर ऐच्छिक केलाय, पण…”, महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण! सर्व प्रकारचे निर्बंध मागे… “२ एप्रिलला असणाऱ्या गुढीपाडव्यापासून आपण राज्यातील करोनासंदर्भातील सर्व निर्बंध मागे घेण्याचा निर्णय मंत्रीमंडळानं घेतला आहे. त्यामुळे ५० टक्के उपस्थिती, मास्क, दुहेरी लसीकरण, मास्कसक्ती हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. पण याचा अर्थ लोकांनी बिनधास्तपणे वागावं असा नाही. लोकांनी काळजी घ्यायला हवीच”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर स्पष्ट केलं आहे.