मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अखेर संचारबंदी जाहीर केली आहे. तसंच जिल्ह्यांच्या सीमादेखील आपण बंद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना ही घोषणा केली. याशिवाय खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरच सुरु राहतील. रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल अशा अनेक महत्त्वाच्या घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरेंनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणी किंवा माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

– तुम्ही मला पाहिल्यानंतर म्हणत असाल आला रे हा बाबा….पण करोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे. मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देतो.

– आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण करोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल .

– एक लक्षात घ्या…कालचा दिवस होता त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहे. सर्वांनी जनता कर्फ्यू चांगला पाळला. थाळ्या, घंटा वाजविल्या पण हे सगळे करोनाला घालविण्यासाठी नव्हते तर वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी होते.

– काल राज्यात १४४ जमावबंदी कलम लावले होते. पण आता मला राज्यात संचारबंदी लावावी लागते आहे. आज सकाळी काही ठिकाणी काही लोक फिरायला बाहेर पडत असल्याची माहिती मिळाली. नाइलाज म्हणून संचारबंदी लागू करत आहोत.

– चार किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र जमता कामा नये.

– आपण राज्याच्या सीमा सील केल्या होत्या. पण आज आपण आंतरजिल्हा सीमादेखील सील करत आहोत. काही जिल्हे, ठिकाणे येथे हा विषाणू पोहोचलेला नाही. त्या जागा सुरक्षित ठेवायच्या आहे. आणि जिथे पोहोचला आहे तिथेच त्याला संपवायचं आहे.

– देशांतर्गत विमानतळ तात्काळ बंद करावे अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे.

– जीवनावश्यक वस्तू, औषधे, औषधे निर्मिती करणार कारखाने, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. बेकरी सुरु असतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील. घाबरण्याचं काही कारण नाही.

– अनेकदा विनंती करूनही पालन होत नसल्याने मला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत आहे.

– सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंद राहतील. प्रार्थनास्थळांमधील धर्मगुरुंना फक्त आत जाऊन प्रार्थना, पूजा करण्याची परवानगी असेल.

– गर्दी नाही म्हणजे नाही. शहरातही बस अत्यावश्यक सेवेसाटी वापरली जात आहे. लोकल बंद केल्या आहेत.

– खासगी वाहनं अत्यंत गरज असेल तरच बाहेर पडतील. अन्यथा बाहेर पडणार नाही.

– टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन आणि रिक्षामध्ये चालक अधिक एक अशी मर्यादित संख्या असेल. तीदेखील अत्यंत महत्त्वाची असेल तरच परवानगी दिली जाणार आहे.

– प्रसंगी आशा, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत.

– घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत.

– ही कठोर पाऊले केवळ जनतेच्या हितासाठी आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus shivsena cm uddhav thackeray announce curfew sgy
First published on: 23-03-2020 at 17:52 IST