करोनाचा प्रादुर्भाव होत असतानाच सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रामध्ये लॉकडाउनचे निर्बंध कठोर करण्याची आवश्यता होती. तसं केलं नसतं तर महाराष्ट्रामध्ये न्यूयॉर्कसारखी परिस्थिती निर्माण झाली असती असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. लॉकडाउनवरुन तुमची आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी आहे का यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी नाही असं उत्तर दे राज्य सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या सर्व निर्णयांना आपला पाठिंबा होता असं म्हटलं आहे. तसेच कठोर लॉकडाउनची महाराष्ट्राला आवश्यकता होती आणि नागरिकांनाही सहकार्य केल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलखतीत पवारांनी लॉकडाउनसंदर्भात महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये मतभेद नसल्याचे स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> Coronavirus : शरद पवार म्हणतात, “ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत परिस्थिती सर्वसामान्य होईल मात्र…”

…तर महाराष्ट्रात न्यूयॉर्कसारखी परिस्थिती निर्माण झाली असती

“लॉकडाउनसंदर्भात तुमची अशी भूमिका आहे की हळूहळू लॉकडाउन उठला पाहिजे. लोकांना मोकळीक दिली पाहिजे अशा संदर्भाची असल्याचे समजते यासंदर्भात काय सांगाल असा प्रश्न पवारांना राऊत यांनी विचाला. या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी, “राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेले सर्व निर्णय सुरुवातीच्या काळात कठोर लॉकडाउन करण्याची आवश्यकता होती. आणि त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झाली. एवढी कठोर भूमिका घेतली नसती तर आपण न्यू यॉर्कसारख्या शहरांमधील बातम्या वाचतोच तशी परिस्थिती निर्माण झाली असती. तिथे मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू झाले आहेत. कठोर पद्धतीनं लॉकडाउन राबवलं आणि लोकांनी सहकार्य केलं म्हणून ही परिस्थिती सुधारण्यास मदत झाली. पहिले दोन महिने अडीच महिने याची आवश्यकता होती आणि तो मुख्यमंत्र्यांचा, राज्य सरकारचा दृष्टीकोन १०० टक्के बरोबर होता. आमच्या सगळ्यांचा याला मनापासून पाठिंबा आहे,” असं मत व्यक्त केलं.

नक्की वाचा >> ‘त्या’ दीड महिन्याच्या कालावधीत मी घराच्या बाहेरच पडलो नाही : शरद पवार

…तर पुढच्या अनेक पिढ्यांना परिणाम सहन करावे लागतील

पवारांनी राज्यातील अर्थचक्र पुन्हा सुरु करण्याची गरज असल्याचेही मत मांडले. एखाद्या राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त झाल्यास करोनापेक्षा त्याचे दृष्परिणाम अधिक भयंकर असतील असं मतही पवारांनी व्यक्त केलं. “देशाची समाजाची आणि राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाल्यास करोनापेक्षा त्याचे दृष्परिणाम पुढील काही पिढ्यांना सहन करावे लागतील. दिल्लीमध्ये, कर्नाटकमध्ये नियम शिथिल केले त्याचे काही परिणाम झाले पण अर्थव्यवस्था आणि व्यवहार सुरु झाले तिथले. अर्थव्यवस्था पुन्हा सवरता कशी येईल यासंदर्भात काळजी घेऊन निर्णय घेणं आणि तेवढ्यापुरती मोकळीक देणं गरजेच आहे. याचा अर्थ सगळं खुल ंकरा असं नव्हते. मात्र थोडी तरी मोकळीक आता हळूहळू द्यायला हवी. आता उदाहर्णार्थ मुख्यमंत्र्यांनी सलून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आवश्यक होतं. लोकांच्या समस्यांबरोबरच या व्यवसायात असणाऱ्या लोकांच्या कौटुंबिक समस्या वाढू लागल्या होत्या. त्यामुळे सलून सुरु करण्याच निर्णय योग्य असल्याचं माझं मत आहे,” असं पवार म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे त्यानुसार निर्णय ते घेतात. मात्र अंत्यंत सावकाश, काळजी घेऊन, हळूहळू, निर्यणाचे दुष्परिणाम होणार नाहीत याची खातरजमा करुन मगच ते निर्णय घेतात,” असंही शरद पवार यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ‘या’ कारणासाठी लॉकडाउनमध्ये बाळासाहेबांची आठवण अधिक आली : शरद पवार

त्या बातम्या खोट्या

लॉकउनसंदर्भातील भूमिकेवरुन पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद होते यासंदर्भातील बातम्यांवरील प्रश्नावरुन पवारांनी प्रसारमाध्यमांना टोला लगावला. “लॉकडाउनमुळे आम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही. बरीचशी काम करता येत नाहीत. अनेक अ‍ॅक्टीव्हीटी थांबल्या आहेत. आणि या अ‍ॅक्टीव्ही थांबल्याचा परिणाम जसे वेगवेगळ्या घटकांवर झाले तसे वृत्तपत्रांवर झालं. मुख्य म्हणजे त्यांना जे वृत्त हवं असतं ते वृत्त देणारे कार्यक्रम कमी झाले. म्हणून मग जागाभरण्यासाठी अशा बातम्या दिल्या गेल्या. याच्यात आणि त्याच्यात नाराजी आहे. मीच मागील काही दिवसांपासून वाचतोय की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद आहेत. पण हे यत्किंचितही सत्य नाही.  पण त्यात सत्य नाही,” असं पवारांनी स्पष्ट केलं आहे.