राज्यात आज दिवसभरात २ हजार ९६८ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, १ हजार ५७३ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याचबरोबर ३९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरत आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत कमी आढळून येत आहे. शिवाय, करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही घट झालेली आहे. मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या शहरात तर आता दिवसभरात करोनामुळे एकाही रूग्णांचा मृत्यू झाला नसल्याची देखील नोंद झालेली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,३०,३९४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.४६ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,९८,२१८ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३९९२५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१४,९४,०९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९८,२१८ (१०.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०१,१६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १००७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण २४,२९२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.