Ajit Pawar on Vaishnavi Hagawane Dowry Harassment Case Updates : पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. नववधूंना आजही हुंड्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी लागते, या विदारक दृष्य असल्याचं महाराष्ट्रातील नागरिक म्हणत आहेत. यामुळे प्रेमविवाह किंवा ठरवून लग्न करणाऱ्या मुलींच्या मनात भीतीचं घर निर्माण झालं आहे. परंतु, अशा साशंक मुली आणि नववधूंसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

“ज्या मुलीची दु:खद घटना घडली आहे, तिच्या वडिलांशी बोललो. मी आज कोल्हापुरातील कार्यक्रम उरकून पुण्यातील त्यांच्या घरी भेटायला जाणार आहे. या दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं. त्या मुलीने मला सांगितलं असतं की मला असा असा त्रास होतोय, तर आपण ताबडतोब कारवाई केली असती”, असं अजित पवार आज माध्यमांना म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “माझं मुलींना आवाहन आहे की वधू म्हणून कोणत्याही कुटुंबात जाता तेव्हा जरा तरी डाऊट आला तर त्यांनी तक्रार करावी. यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. इतकी मोठी वेळ कोणावरही येणार नाही.”

आम्ही कस्पटे कुटुंबाच्या पाठीशी आहे

“पालकांनी इच्छा व्यक्त केली, त्यानुसार राज्याचे प्रमुख आणि गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस आणि मी पुण्याचा पालकमंत्री या नात्याने जातीने लक्ष घालत आहोत. हगवणे परिवारातील दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे. कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही, याची काळजी पोलीस खातं घेतंय. आम्ही कस्पटे कुटुंबाच्या पाठीशी आहे”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

माझा दुरान्वयेही संबंध नाही

“माझा दुरान्वयेही संबंध नाही. तो पक्षाचा कार्यकर्ता होता. माझे विचार स्पष्ट आहेत सर्वाना माहितेय. जवळचा, लांबचा असो त्याचा विचार करत नाही. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. लग्न झालेल्या मुलींच्या बाजूने कायदा अधिक कडक केला आहे”, असाही पुनरुच्चार त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मीडियाचे लोक माझा फोटो दाखवत आहेत, मी तुमच्या घरातील लग्नात आलो, फोटो काढला आणि काही झालं तर माझा काय दोष आहे? असे आरोप माझ्यावर होणार असतील तर मी यापुढे कोणाच्या लग्नाला नाही जाणार, असं मी बोलल्यावर समोरची लोक हसले यात माझा दोष काय?” असंही अजित पवार म्हणाले.