जालन्यातील अंबड येथे ‘ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अन्य ओबीसी नेत्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केलं. यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तसेच, मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणावरून तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

“ओबीसी समाजावर अन्याय होईल, असे निर्णय सरकार घेणार नाही. तसेच, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मराठा आणि ओबीसी समाजात तणाव वाढताना दिसत आहे, याबद्दल प्रतिनिधीनं प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यात कुठलेही समाज एकमेकांसमोर उभे राहतात, अशी परिस्थिती निर्माण होणं योग्य नाही. सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट घोषणा केली आहे.”

हेही वाचा : राजेश टोपे अन् रोहित पवारांचा उल्लेख करत भुजबळांनी केला ‘तो’ आरोप, जरांगे-पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले…

“ओबीसी समाजावर अन्याय होईल, असे निर्णय राज्य सरकार घेणार नाही. महाराष्ट्रात शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करूयात,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

हेही वाचा : “तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही”, भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जरांगे-पाटील म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रूग्णालय आपल्या दारी’ या योजनेबद्दलही देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे. “नागपुरात खणिकर्मचा निधी उपलब्ध आहे, त्यातून ‘रूग्णालय आपल्या दारी’ ही योजना सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. यामाध्यमातून गोरगरीब जनतेला आरोग्यव्यस्था दारी मिळेल,” असं फडणवीसांनी सांगितलं आहे.