मुंबईत आज मराठी भाषा भवनासाठीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी मराठी भाषेचं महत्व विषद करून सांगतानाच नव्या पिढीला मराठी भाषेबद्दल अनास्था असल्याची खंत देखील अजित पवारांनी व्यक्त केली. यावेळी अजित पवारांनी मराठी माणसाच्या बोलण्याच्या सवयीवर देखील बोट ठेवलं. त्यांनी मारलेल्या टोल्यानंतर उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

“..तर मंत्र्याला वाटतंय आपलीच जागा द्यायचीये!”

मराठी भाषा भवनासाठी महसूल विभागानं तातडीने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल अजित पवार यांनी बाळासाहेब थोरातांचे आभार मानले. तसेच, यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत भूमिका मांडली. “बऱ्याचदा एखाद्या विभागाची जागा एखाद्या प्रकल्पासाठी हवी असेल, तर त्या विभागाच्या मंत्र्याला वाटतं की आपल्याच जवळजी जागा द्यायची आहे. तो आखडूनच बसतो. देतच नाही. काही ना काही कारणं काढतो. मला कळतच नाही. मी म्हणतो आरे किती दिवस? जोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे विभाग दिलाय, तोपर्यंत विभाग आहे. उद्या काढून घेतला तर दुसऱ्याकडे जाईल. तरी हा एक मनुष्यस्वभाव आहे. त्याचा अनुभव गेल्या ३० वर्षाच्या राजकीय जीवनात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आला आहे. मुख्यमंत्र्यांनाही गेल्या अडीच वर्षांत त्याचा थोडाबहुत अनुभव आला आहे”, असं अजित पवारांनी म्हणताच व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये हशा पिकला.

मुख्यमंत्र्यांच्या भाषेचं कौतुक

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठी भाषेचं कौतुक केलं. “उद्धवजींची मराठी भाषा आम्ही जवळून अनुभवतोय. त्यांची मराठी भाषा वेगळी आहे. हळूहळू बोलत असताना ते गुदगुल्या करतात. शालजोडीतून मधूनच समोरच्याचं वस्त्रहरण करणारी उद्धव ठाकरेंची मराठी भाषा आहे. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अस्त्र आहे. आदित्य ठाकरे देखील चांगलं मराठी बोलतात. महाराष्ट्राला आपलंसं करून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“मराठी माणूस म्हटल्यावर त्याच्या आयुष्यात संघर्ष आलाच; जो इतिहास विसरतो त्याला भविष्यकाळ राहत नाही”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी भाषेविषयी अनास्था!

अजित पवारांनी यावेळी मराठी माणसाची मराठी भाषेविषयी अनास्था असल्याचं सांगितलं. “इतर भाषिक भेटतात, तेव्हा एकमेकांशी स्वत:च्या मातृभाषेत बोलतात. पण तुम्ही मुंबईत अनुभव घ्या. दोन मराठी माणसं भेटली, तर तुम्हीच सांगा ते एकमेकांशी कोणत्या भाषेत बोलतात? सुरुवातीला इंग्रजीत बोलतील. मग त्यांचं इंग्रजी थकतं. मग दोघंही अडखळतात. मग हिंदीवर येतात. मग हिंदीतून सुरूवात होते. त्यापेक्षा दोघांनी जर मराठीतच बोललं तर? मराठी भाषेबद्दल आपल्याला प्रेम नाही का? त्याबद्दल न्यूनगंड असेल, तर आपल्या भाषेचा विकास कसा होईल?” असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थित केला.