हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी ( २६ मे ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डीजवळील कोकमठाण येथे झालं. त्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी आणि कोपगावातील शेतकऱ्यांचं आभार मानले आहेत.

“राज्याचा विकास करायचा असेल, तर मागास भाग मुंबई आणि बंदरला जोडणं आवश्यक होतं. समृद्धी महामार्ग अनेकांना केवळ स्वप्न आणि घोषणा वाटायचा. पण, मला आणि एकनाथ शिंदेंना विश्वास होता, की महामार्गाचं काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. आज ते होताना दिसत आहे. ‘अंदाज कुछ अलग है, मेरे सोचनेका, सबको मंजिलो का शौक हे, और मुझे रास्ते बनाने का,'” अशी शेरो शायरी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा : “भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे”, गजानन कीर्तिकरांनी व्यक्त केली खंत; म्हणाले, “लोकसभेला…”

“ज्या गावात जाऊन विरोध केला, तेथील लोकांनी…”

“समृद्धी महामार्गासाठी जागा हस्तांतरित करण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषदेत कायदा केला. न भुतो असा दर जागेसाठी दिला. पण, अनेक लोकांनी याला विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरला जाऊन सभा घेतली. हा महामार्ग होऊ देणार नाही, असं सांगितलं. शरद पवार यांनी नगर जिल्ह्यात बैठक घेत, हे शक्य नसल्याचं म्हटलं. मात्र, ज्या गावात जाऊन विरोध केला, तेथील लोकांनी स्वत:हून जमीन देण्यास तयार असल्याचं पत्र दिलं,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आता गोंदियापर्यंत विकास होणार”

“राज्यातील पंधरा जिल्ह्यांचं भाग्य समृद्धी महामार्ग बदलणार आहे. आधी मुंबई आणि पुण्याचा विकास व्हायचा. पण, आता गोंदियापर्यंत विकास होणार आहे. त्यामुळे उद्योगधंदे, कृषी समृद्धी या सर्व गोष्टी महामार्गामुळे तयार करू शकणार आहोत,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

हेही वाचा : “शिंदे गट म्हणजे भाजपाने पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा”, राऊतांच्या विधानावर शहाजीबापू पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हे एका…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महामार्ग जरी वेगवान असला, तरी…”

“समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) लवकर बसवण्यात यावी, अशी विनंती करतो. महामार्गावर १२० ची किमी वेग मर्यादा असली, तरी सर्व गाड्या या वेगात चालण्यायोग्य नाहीत. त्यामुळे अशा गाड्या घेऊन वेगाने जाऊ तर अपघात होऊ शकतो. महामार्ग जरी वेगवान असला, तरी आपलं जीवन त्यापेक्षा मुल्यवान आहे. म्हणून लोकांनी काळजी घेतली पाहिजे,” असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.