विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेलापूरमध्ये महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस मला आजही मुख्यमंत्री असल्याचे वाटत असल्याचे म्हणाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. फडणवीस दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यासाठी आज सकाळी पणजी येथे पोहोचले. यावेळी ते बोलत होते.

मला आजही मी मुख्यमंत्री असल्याचे वाटत, या वक्तव्यामुळे तुमच्यावर टीका होत आहे?, यावर बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “टिका करणाऱ्यांनी माझं वाक्य जर पुर्ण ऐकलं असतं. तर अशा प्रकारची टीका केली नसती. मी स्पष्टपणे सांगितलं की माझ्यासोबत जे लोकं आहेत. या लोकांनी मला असं कधी वाटू दिलं नाही (मुख्यमंत्री नाही). त्यांचा खंबीर पाठिंबा माझ्यासोबत आहे आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे, हे मी सांगितलं. पण काही लोकांची बुद्धी थोडी कमी असते. ज्यांची बुद्धी कमी असते त्यांना वक्तव्य समजल नाही. त्यामुळे कमी बुद्धीच्या लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर मी बोलणार नाही.”

फडणवीस काय म्हणाले होते?

दरम्यान, नवी मुंबईतील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं होतं. मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे. मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं, असं फडणवीस म्हणाले होते.

तुम्ही मुख्यमंत्री नाही हे मनातून काढून टाका कारण…; नवाब मलिकांची फडणवीसांवर मिश्किल टिप्पणी

कोणी केली टिका?

नवाब मलिक म्हणाले, “दोन वर्ष फिरत असताना मला असं वाटत नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी मुख्यमंत्रीच आहे असं मला वाटतं असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मला वाटतं दोन वर्ष होऊन गेली आहेत. पण ते मुख्यमंत्रिपदाच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाहीत. विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत त्यांनी काम केलं पाहिजे. ते मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी मनातून काढलं पाहिजे. विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मोठं आहे. ते पद मुख्यमंत्रिपदापेक्षा कमी नाही हे त्यांना कळलं पाहिजे”.

“अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय” म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांचा चिमटा; म्हणाले…

फडणवीसांना शरद पवारांचा चिमटा

शरद पवार यांनीही फडणवीसांच्या त्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांचं मी सर्वात आधी अभिनंदन करतो, असं म्हणतच त्यांनी आपल्या शेलक्या शब्दांच्या माऱ्याला सुरूवात केली.

आज मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना पवार यांनी फडणवीसांना चांगलाच टोला लगावला आहे. ते म्हणाले, “पाच वर्ष सत्तेत असल्याचं स्मरण राहणं हे कधीही चांगलं. वेदना किती खोल आहे हे यातून दिसतं, पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे हे मी कबूल करतो. सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं”. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो, असा सल्लाही पवार यांनी फडणवीसांना दिला आहे.

संजय राऊत यांनीही लगावला टोला 

या विधानावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही टोला लगावण्याची संधी सोडली नाही. “अजूनी यौवनात मी असं अनेकांना वाटतं. हे नाटक रंगमंचावर फार गाजलं. तसं अनेकांना वाटतं की अजूनी यौवनात मी. मी अजूनही मुख्यमंत्री… आम्हालाही दिल्लीत गेल्यावर कधी कधी वाटतं आमचा पंतप्रधान होणार. त्यांची भावना योग्य आहे. स्वप्नात रममाण व्हावं माणसाने, चांगली स्वप्ने पाहावीत. स्वप्नांना बळ असावं, त्यांच्या पंखांना ताकद यावी. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यात जावं, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.